उमदीत पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत इशारा; विस्तारित म्हैशाळ योजनेस मंजुरी द्यावी व सोमवारी उद्योग मंत्री उदय सामंत हे जत दौऱ्यावर येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर पाणी संघर्ष समितीची उमदी येथे बैठक पार पडली.
जत, प्रतिनिधी
राज्य सरकारने जत तालुक्यातील सीमा वरती भागातील जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात. विस्तारित म्हैशाळ योजनेच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री यांनी १९०० कोटी इतका निधी देण्याचा जाहीर केला आहे . परंतु सदर योजनेला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देऊन तरतूद येत्या कॅबिनेटमध्ये घ्यावी, तशी घोषणा आज सोमवारी दौऱ्यावर येत असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी करावी त्यांचे जरूर स्वागत करू. तसेच विस्तारित म्हैसाळ योजनेची निविदा प्रक्रिया डिसेंबर अखेर पार पाडावी अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर कर्नाटकात जाण्याचा विचार करू असा इशारा पाणी संघर्ष समितीने दिला आहे.
उमदी (ता.जत) पाणी संघर्ष समितीची भाऊसाहेब महाराज मठ येथे बैठक पार पडली. या बैठकीस पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार, अनिल शिंदे, चिदानंद संख, मलय्या स्वामी, बाळू पाटील, आमिन तांबोळी, दावल शेख ,रमेश मिराखोर,महमद कलाल आदी उपस्थित होते.
पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार म्हणाले, यापूर्वी देखील जत पूर्व भागातील वंचित गावांना पाणी देण्याच्या संदर्भात कर्नाटकातील हिरे पडसलगी या योजनेचा सर्व्हे करण्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १० कोटीचा निधी जाहीर केला होता परंतु यानंतर कोणतीही कार्यवाही केली नाही . तात्कालीन मुख्यमंत्री यांनी घोषणा करूनही एक रुपयाचाही निधी मिळाला नाही. ही घोषणा फसवी ठरली आहे. तदनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संख येथील प्रचार सभेत विस्तारित योजनेला तत्वता मान्यता दिली होती . लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काम सुरू झाले असते तर ११०० कोटी इतक्या निधीमध्ये काम पूर्ण झाले असते परंतु ही योजना मंजूर करण्यास अद्यापही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आज या योजनेस २००० कोटी इतका निधी प्रस्तावित करावा लागणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सदरची योजना येत्या कॅबिनेटमध्ये तांत्रिक, प्रशासकीय मान्यता द्यावी व निधीची तरतूद करावी अन्यथा २३ डिसेंबर नंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कर्नाटकात जाण्याचा विचार इथली जनता करू शकते त्यामुळे तात्काळ सदरची योजना मंजूर करावी. घोषणा म्हणजे वेळ काढू पणा असल्याची भावना दुष्काळग्रस्तांची आहे.