अध्याय तेविसावा
भगवंत म्हणाले , उद्धवा जो विवेकसंपन्न वैरागी असतो त्याच्या बद्दल मी नेहमीच बोलत असतो. त्याला चांगलं काय आणि वाईट काय हे व्यवस्थित समजत असतं त्यातून तो चांगल्याचीच निवड करतो आणि आत्मोन्नती करून घेतो म्हणून त्याचे नाव नेहमीच माझ्या तोंडात असते. त्याच्या कृतीचे मी स्वतः वर्णन करतो. कारण विवेकसंपन्न वैरागी माझा फार आवडता असतो. वैराग्यापेक्षा थोर असे भाग्य जगामध्ये दुसरे काहीच नाही. उद्धवा! जो खरोखर विवेकाने व वैराग्याने युक्त असतो, तो माझा जीव की प्राण असतो. विवेकाने आणि वैराग्याने जो संपन्न झाला तो माझ्यामध्येच आला म्हणून समज. मी त्याच्या शब्दांना वश झालेला असतो आणि तोही मला सर्वस्वी विकलेला असतो. लोभी ब्राह्मणाचे सर्व द्रव्य गेले, द्रव्याबरोबर मान अभिमान गेला आणि त्या अभिमानाबरोबरच द्वंद्वापासून होणारे भयंकर सुखदुःखही गेले. अभिमानी असताना मी मोठा, शहाणा, श्रीमंत असे वाटत असते आणि त्याचा परिणाम इतरांना तुच्छ लेखण्यात होतो व इतरांना तुच्छ लेखण्यातच आनंद मिळतो. त्यातच कुणी त्याच्यापेक्षा अभिमानी भेटला की, तो याला तुच्छ लेखतो. त्यामुळे दुःख होते.
लोभी ब्राह्मणाला द्रव्य जाताच विरक्ति उत्पन्न झाली, त्यामुळे तो नियमनि÷ संन्यासी बनला आणि भिक्षेकरिता पृथ्वीवर हिंडत असताना दुष्ट लोकांनी दुर्भाषणाने त्याची निर्भत्सना केली. अनेक प्रकारच्या विकारांनी पीडा दिली किंवा नानाप्रकारांनी उपद्रव दिला तरीही तो आपल्या दृढनिश्चयापासून तो ढळला नाही. त्याला स्वधर्माच्या धैर्याने पूर्ण अभेदस्वरूप केले होते. संन्याशाचा पूर्ण स्वधर्म हाच की, मी देहाहुन भिन्न असून नारायणस्वरूप आहे अशा ज्ञानाने त्याने खरोखर देहाभिमान टाकलेला
असतो.
म्हणूनच तो आत्मस्वरूपापासून ढळत नाही. छायेवर घाव बसला असता त्या पुरुषाला भयाचा संशयसुद्धा नसतो, त्याप्रमाणे दुर्जनांनी देहाला ताडन केले असता निरहंकार असणाऱयाला दुःख आणि भयही प्राप्त होत नाहीत. देहाला नानाप्रकारच्या पीडा झाल्या असता आपली जी देहातीत स्थिति झाली, तीच गाथा त्या ब्राह्मणाने सांगितली. आपल्या सुखदुःखांना कारण आपला भ्रम होय. मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही. दुसरा दुःख देतो, हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे. हे सगळे जग आणि यातील मित्र, उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पलिले आहेत. अविद्यात्मक जे आपले अज्ञान , त्यात मनाच्या स्वरूपाने मनच उत्पन्न होते आणि त्या मनानेच पूर्ण भेद उत्पन्न करून ते सुखदुःख भोगावयास
लावते.
आत्मा हा भेदरहित आहे. शत्रु, मित्र, उदासीन असे भेद ते सर्व मनच स्वतः चाळविते. अशा रीतीने भेदामध्ये मन गुंतून राहणे हेच पुरुषाचे अज्ञान होय. अशा भ्रांत झालेल्या मनुष्याला त्या द्वंद्वदुःखाने संसार भयदायक होतो. मन हेच सुखदुःखाला कारण आहे आणि संसार हीही मनाची कल्पनाच आहे हे लक्षात ठेव. त्या मनाचा निग्रह कसा करावा ते तुला सांगतो. माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव बस्स! सर्व योगसाधनेचे हेच सार आहे. ज्याला संसाराचे दुःख नष्ट करावयाचे असेल, त्याने मनाचे अवश्य नियमन करावे. कारण, मनाशिवाय दुसरे कोणी दुःख देणारे त्रिभुवनात नाही. मन हे अत्यंत चंचल आहे. ते सहसा स्थिर होत नाही. याकरिता भेदभाव नाहीसा होईल असा मोकळा विचार त्याला रात्रंदिवस करावयास द्यावा. मन हे विवेकाला घुलाटणी देईल, याकरिता मन व विवेक या दोघांनाही हातबेडय़ा घालून रात्रंदिवस एकमेकांजवळ ठेवावे. म्हणजे मन जिकडे विकल्प उत्पन्न करावयाला धावेल, तेथे त्या विकल्पाचा फडशा पाडणारा विवेक तत्परतेने उभा असतो, आणि मन जेथे अधर्माकडे वळण्याचा संभव दिसतो, तेथे विवेकही त्याला हाकून देण्याला धावत येतो. मन कामक्रोधापाशी जाऊन बसले की, विवेक त्याचे केस धरून त्याला मागे खेचतो. मन निंदेजवळ गेले की, विवेक त्याला बुकलत असतो.
क्रमशः