सायप्रस / वृत्तसंस्था
पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशांना कडक शब्दात फटकारले आहे. सायप्रस येथे भारतीय समुदायासोबत बोलताना त्यांनी “आम्हाला चांगले शेजारी देश हवेत याचा अर्थ दहशतवादाच्या दबावाला बळी पडून वाटाघाटी कराव्यात, असा होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला भारत मान्यता देणार नसल्याचा सूचक इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. तसेच चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेवरही टीका केली.
पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारताचे शेजारी आहेत. मात्र, दोन्ही देशांच्या सीमारेषेवर बऱयाचवेळा संघर्षाची स्थिती निर्माण होते. भारत सध्या या संघर्षावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढत असला तरी काही मुद्दय़ांवर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. दहशतवादामुळे भारतात जेवढे नुकसान झाले आहे, तेवढे नुकसान इतर कोणत्याही देशाचे झाले नसल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारताला सर्व शेजारी देशांसोबत चांगले संबंध हवे आहेत. मात्र, दहशतवादाच्या मुद्दय़ावर तडजोड करावी असा त्याचा अर्थ होत नाही. दहशतवादाला शस्त्र बनवून त्याचा धाक दाखवत भारताला वाटाघाटीच्या चर्चेसाठी बसवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. तसेच चीनसोबतच्या सीमावादाबाबत बोलताना ‘एलएसी’ला एकतर्फी पद्धतीने बदलण्यास भारताचा विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले.