सर्व आमदारांना विश्वासात घेणार मुख्यमंत्री : काँग्रेसच्या बैठकीत ठरणार पक्षाची भूमिका भाजप गाभा समिती, मंत्रिमंडळाचीही बैठक
प्रतिनिधी /पणजी
म्हादई प्रश्नावर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सोमवार दि. 2 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पर्वरी येथील विधानसभा संकुलात राज्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावली असून त्यात म्हादईप्रकरणी गोव्याचा आवाज बुलंद करण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन गोव्याची बाजू मांडली जाईल. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या सूचना लक्षात घेऊन एकमताने निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
म्हादई नदीवर कर्नाटकात धरणे, बंधारे बांधण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिल्यामुळे गोवा राज्यात खळबळ निर्माण झाली असून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कर्नाटक सरकारतफ्xढ धरण, बंधारे बांधण्यासठी विविध कामे सुरू असतानाही गोवा सरकार गाफ्ढिल राहिले आणि आता कर्नाटकला मान्यता दिल्यानंतर सावंत सरकार झोपेतून जागे झाल्याची टीका सुरू आहे.
काँग्रेसची दुपारी बैठक
विरोधी पक्ष असलेल्या काँगेस आमदारांची तत्पूर्वी दुपारी 2 वाजता बैठक होणार असून त्यात म्हादईप्रकरणी काँगेस पक्षाची भूमिका ठरणार आहे. त्यानंतर काँग्रेसचे आमदार सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी दिली.
मंत्रिमंडळ, भाजपचीही बैठका
म्हादईच्या विषयावर आजच दि. 2 जानेवारी रोजी मंत्रिमंडळ बैठक, भाजप आमदार तसेच गाभा समितीची बैठकही घेण्यात येणार आहे. त्यात म्हादईप्रश्नी पुढे कोणती पावले उचलावीत यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
म्हादई रक्षणासाठी साहित्यिकही सरसावले सतराव्या शेकोटी साहित्य संमेलनात ठराव संमत
म्हादई ही गोमंतकाची जीवनदायिनी आहे. तिचा गळा घोटला गेल्यास येथील शेती बागायती व कुळागरांबरोबरच साहित्य व संस्कृतीवरही दूरगामी परिणाम होणार आहेत. म्हणून म्हादई वाचविण्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्याचा ठराव कोकण मराठी परिषदेच्या सतराव्या शेकोटी साहित्य संमेलनात काल रविवारी घेण्यात आला. केरी-फोंडा येथील श्री विजयादुर्गा मंदिरच्या सभामंडपात भरलेल्या या संमेनलाचा रविवारी समारोप झाला. कोमपचे सल्लागार अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी समारोप सोहळय़ात मांडलेला म्हादई संबंधीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.