भोसरी : शिवसेना-भाजप युती ही काळाची गरज होती. 2019 ला ही युती व्हायला हवी होती. मात्र, ती झाली नाही म्हणूनच आम्ही सहा महिन्यापूर्वी ही युती करून दाखवली. मुख्यमंत्री तुमच्या मनातला आणि तुमचा आहे. त्यामुळे तुमच्या मनातील सर्व कामे आम्ही करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. हे सरकार काम करणारे असून आमच्या सरकारमुळे राज्याची प्रगती होत असल्याचे देखील शिंदे म्हणाले.
शिवांजली सखी मंच आणि आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेली दोन अडीच वर्ष लोक अक्षरशः दबून बसले होते.मात्र आम्ही सहा महिन्यापूर्वी जनतेच्या मनातील सरकार आणले आणि मागील सरकारने लावलेले सर्व निर्बंध उठवले. हे सरकार काम करणारे आहे. लोकांच्या मनातील आहे. शिंदे फडणवीसांचे हे डबल इंजिनचे सरकार वेगाने धावत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याची प्रगती होत आहे.
शिवसेना-भाजप युती ही काळाची गरज होती. असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेली अडीच वर्ष अनेकांना अनेक त्रास भोगावे लागले मात्र आता चिंता करू नका. लोकांच्या हिताची कामे करा आम्ही दोघे आहोत. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या आमच्या सरकारने तळागाळातील समाज घटकांसाठी हिताचे निर्णय घेतले आणि यापुढेही घेत राहणार आहोत. आपल्याला कमी वेळात जास्तीचे काम करावे लागणार असून या सरकारमधील मंत्री सोडा, आमदार सुद्धा तेवढेच ताकदीने काम करत असल्याचे इंद्रायणी थडीमध्ये आल्यानंतर दिसेल. आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडीच्या माध्यमातून वीस लाख लोकांना एकत्र आणण्याची किमया साधली हे या सरकारचे यशच आहे.
अधिक वाचा : मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित
यापुढील काळात पिंपरी चिंचवडमधील मूलभूत सुविधांसाठी प्राधान्य दिले जाईल. आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या शहराचा कायापालट करू. इंद्रायणी थडीसारख्या जत्रा बाजारपेठ उपलब्ध करून देतात. यातूनच छोटे-मोठे उद्योजक उभे राहतात. अर्थव्यवस्थेला उभारी मिळते असे देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.