संसदेतील अभिभाषणात राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन, देशात आता वेगवान निर्णय घेणारे सरकार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार सातत्याने सेनादलांच्या आधुनिकीकरणासाठी कार्यरत आहे. या सरकारने सीमेवर शेजाऱयांकडून करण्यात आलेल्या प्रत्येक दुःसाहसाला हाणून पाडून सीमांचे संरक्षण केले आहे. देशात आज वेगवान निर्णय घेणारे सरकार स्थानापन्न असून देशाची अर्थव्यवस्थाही बळकटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पाकिस्तानपुरस्कृत सीमापार दहशतवादाला मोडून काढण्याकरिता सेना कार्यरत आहे, असे अभिमानास्पद प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. त्या संसदेसमोर अभिभाषण करताना मंगळवारी बोलत होत्या.
आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात त्यांनी अर्थ, संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, कृषी आणि उद्योग तसेच सामाजिक स्थिती आदी महत्वाच्या मुद्दय़ांचा उल्लेख केला, या क्षेत्रांमध्ये सरकारने केलेल्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. गेल्या वर्षात तसेच गेल्या साधारणतः 9 वर्षांमध्ये केंद्र सरकारने जी विकासाभिमुख धोरणे क्रियान्वित केलेली आहेत, त्यांचा आढावा त्यांनी घेतला.
प्रगत राष्ट्रांमध्ये समावेश होणार
केंद्र सरकारने पुढील 25 वर्षांचा कालावधी दृष्टीसमोर ठेवून धोरणांची निश्चिती केली आहे. त्यामुळे येत्या 25 वर्षांमध्ये भारताचा समावेश जगातील सर्वात बलाढय़ देशांच्या रांगेत होणार आहे. आज तो बलवान राष्ट्रांच्या गटात समाविष्ट झालेलाच आहे. यापुढची 25 वर्षे हा भारतासाठी ‘अमृतकाळ’ राहणार आहे. आपल्या भूतकाळाचा गौरवही वाढेल आणि आधुनिकतेचा आधारही असेल अशा प्रकारे देशाला आकार देण्याचे सरकारचे धोरण आहे. 2047 पर्यंत, अर्थात स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत भारत गरीबी आणि दैन्यापासून मुक्त झालेला असेल असे ध्येय सरकारने उराशी बाळगलेले असून त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी दमदार वाटचाल करण्यात येत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘सबका प्रयास’ मंत्र
गेल्या 9 वर्षांमध्ये केंद सरकारने सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या त्रिसूत्री मंत्राचा उपयोग केला आहे. देशाच्या विकासात प्रत्येक व्यक्तीचे आणि प्रत्येक समाजघटकाचे योगदान असावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. भारताला विकसीत राष्ट्र म्हणून ओळख देण्याच्या दृष्टीने धोरणे निर्धारित केली आहेत. याचा परिणाम म्हणून भारताकडे बघण्याच्या जगाच्या दृष्टीकोनात मोठेच सकारात्मक परिवर्तन झालेले आहे, असा अनुभव येत आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये नागरीकांसाठीच्या मूलभूत सुविधांना बळकटी देतानाच अत्याधुनिक पायाभूत सुविधा देण्याचे महत्वाचे कार्यही सरकारकडून केले जात आहे. भारताच्या डिजिटल नेटवर्कपासून विकसीत देशही प्रेरणा घेत आहेत. भारत आज धोरणलकव्यातून मुक्त झाला असून दूरगामी विचार आणि धोरणे क्रियान्वित करण्यास सज्ज झाला आहे, हे मुद्दे राष्टपती मुर्मू यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
देशहिताला सर्वोच्च प्राधान्य
गेल्या 9 वर्षांमध्ये सरकारने केवळ देशहितालाच प्राधान्य दिले आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यासही मागे पुढे पाहिले गेले नाही. भ्रष्टाचाराच्या संदर्भात ‘शून्य सहनशीलता’ हे धोरण कसोशीने आचरणात आणले गेले. यासाठी निनावी संपत्ती विरोधी कायदा करण्यात आला. सरकारी निविदा संगणकीय पद्धतीने दिल्या गेल्याने भ्रष्टाचाराला खीळ बसली आहे. 3 लाख कोटी रुपयांची कामे आतापर्यंत अशा स्वच्छ पद्धतीने देण्यात आली आहेत. जीएसटी आणि तत्सम आर्थिक धोरणांमुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली असून व्यवहारांमध्ये शुद्धताही आली आहे. सरकारी योजनांची अनुदाने लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केल्याने मध्यस्थ दलालांच्या भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. जनधन, आधार आणि मोबाईलमुळे हे साध्य झाले आहे. गरीबांच्या चिंतांवर स्थायी तोडगा काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले असून त्यांचे सुपरिणाम आता दिसून येऊ लागले आहेत, अशीही मांडणी त्यांनी केली.
आत्मनिर्भरतेच्या दिशेने…
मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणांमुळे भारताला मोठेच यश मिळाले आहे. या धोरणांमुळे भारतात आज जगभरातून उत्पादन कंपन्या येत आहेत. भारतीय निर्मितीला प्राधान्य दिल्याने संरक्षण सामग्रीच्या निर्यातील 6 पट वाढ झाली आहे. भारत आज जगातील एक मोठा मोबाईल निर्यातदार देश झाला आहे. तर दुसऱया बाजूला मुलांच्या खेळण्यांच्या आयातीत 70 टक्के घट झाल्याने देशात रोजगार निर्मिती झाली आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये 3 लाख किलोमीटर लांबीचे ग्रामीण मार्ग तर 50 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले आहेत. विमानतळांची संख्या 74 वरुन 147 वर पोहचली आहे. देशाच्या सीमाभागात मार्गांचे जाळे प्रथमच विकसीत करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणावर भर देण्यात आला असून वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या याच 9 वर्षांमध्ये 260 ने वाढली आहे. याच कालावधीत 300 हून अधिक विश्वविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. 2014 पूर्वीच्या 10 वर्षांमध्ये केवळ 145 वैद्यकीय महाविद्याये आणि 100 विश्वविद्यालये स्थापन करण्यात आली होती. 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या तुलनेत 2014 ते आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे, असे तुलनात्मक मुद्देही त्यांनी भाषणात विशद केले.
जी-20 ची अध्यक्षता
भारताने केवळ आपलाच विचार केलेला नाही. जगाच्या हिताच्या दृष्टीनेही अनेक पावले उचलली आहेत. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या मंत्राच्या आधारे आपल्या देशाच्या प्रगतीसमवेतच जगालाही आपल्यासह घेत भारताची जोमदार वाटचाल होत आहे, असे गोरवास्पद प्रतिपादन त्यांनी केले.
विरोधकांची टीका
राष्ट्रपतींचे भाषण हे सरकारची री ओढणारे होते, अशीं टीका विरोधी पक्षांनी केली आहे. हे भाषण 2024 ची लोकसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून केले गेले. त्याला राष्ट्रीय नव्हे तर राजकीय रंग होता. संसदेत अशा प्रकारची राजकीय भाषणे राष्ट्रपतींकडून करण्याची प्रथा नाही, अशी टिप्पणी विरोधकांनी केली.
9 वर्षांच्या कामगिरीवर दृष्टीक्षेप
ड अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून प्रगतीचा आढावा
ड गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्र सरकारने स्वीकारलेल्या धोरणांना उजाळा
ड पुढील 25 वर्षांमध्ये भारताला एक बलाढय़ राष्ट्र घडविण्याचे ध्येय
ड गेल्या 9 वर्षांमध्ये केवळ देशाच्या हिताचाच सरकारकडून विचार