भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन
Give Tilari Dam water to Ker Panchkroshi – Rajan Teli
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या पाण्यापासून तिलारी खोऱ्यातील जी गावे वंचित आहेत. त्यांना हे पाणी मिळण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी एका निवेदनाने केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात श्री. तेली यांनी निवेदनही दिले आहे.तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या पाण्यापासून केर, मोर्ले, पाळये, सोनावल, मेढे ही गावे वंचित आहेत. तिलारी धरणापासून सहा ते सात किमी अंतरावर असणाऱ्या या गावात पाण्याचा दुष्काळ आहे. परिणामी तेथील अनेक हेक्टर जमीन क्षेत्र पडीक आहे. हे क्षेत्र ओलिताखाली येणे आवश्यक आहे. तिलारी नगर बोगद्यातून वाया जाणारे पाणी खराडी नदी जवळ अडवून लोखंडी पाईपद्वारे या गावांकडे वळविल्यास तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम होतील. तसेच गोव्यात नोकरी निमित्त ये – जा करणाऱ्यांना अनेक तरुणांना या ठिकाणी शेती करण्याची संधी मिळेल असेही श्री. तेली यांनी या निवेदनात म्हटले आहे.
दोडामार्ग – वार्ताहर