पुणे / प्रतिनिधी :
छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राच्या मातीत सहकार रुजला असून, सहकार क्षेत्र शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे काम महाराष्ट्राने केले असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काढले. आगामी काळात केंद्र सरकारकडून नवे सहकार धोरण तयार करण्यात येणार असून, पुढील 20 वर्षांत सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
‘लोकमान्य मलिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी’ प्रस्तुत व ‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित दुसऱ्या दोन दिवसीय सहकार महापरिषदेचा (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. त्या वेळी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, मंत्री राधाकृष्ण विखे पहाटील, मुंबई सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शहा म्हणाले, अनेक वर्षापासून कृषी आणि सहकार ही खाती स्वतंत्र असावीत, अशी मागणी होती. ती मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. यापुढे सहकारावर सरकारचा भर राहणार असून, या दोन दिवसीय चर्चेतून आलेले प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करू. देशातील काही राज्यांमध्ये सहकार क्षेत्राचे मजबूत जाळे आहे. त्यात महाराष्ट्राचा प्रामुख्याने समावेश होतो. येथील सहकाराची परंपरा मोठी आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून या भूमीत सहकार रुजला, वाढला आहे. मुख्य म्हणजे सहकार क्षेत्र शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्राने केले असून, शेवटच्या माणसाला बळ देण्याचे काम या सहकारानेच केले आहे. 8.5 लाख सोसायटय़ातील 2 लाख महाराष्ट्रात असून, सहकारी बँकात 3.25 लाख कोटी रुपये जमा आहेत.
आज सहकार क्षेत्रात काही उणिवाही पहायला मिळत आहे. काही ठिकाणी चांगले चित्र पहायला मिळते, तर कुठे तितकीशी समाधानकारक स्थिती दिसत नाही. सहकारी बँकांमधील घोटाळे, ही काही योग्य गोष्ट नव्हे. नवीव सहकारी बँका निर्माण होत असतानाच बुडणाऱया बँकांचा विचार करूनच पुढे जायला हवे. आपण संस्था टिकवल्या पाहिजेत. चांगल्या चालवल्या पाहिजेत. सोलापूर, नागपूर, कोल्हापूर या जिल्हा सहकारी बँकांमध्ये घोटाळे झाले. राज्यातल्या कित्येक बँकांवर प्रशासक नेमावा लागला, हे दुर्दैवी आहे. तथापि, आता आपण सुधारले पाहिजे. आपण चुका करायच्या आणि सहकार्याची अपेक्षा करायची. यात अर्थ नाही. असे असेल तर तुम्हाला सहकार्य मिळणार नाही, असेही शहा यांनी सुनावले.
दोन लाख बहुउद्देशीय संस्था निर्माण करणार
महाराष्ट्रासारख्या राज्यात आजदेखील काही संस्था खूप चांगल्या पद्धतीनेही काम करतात. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. आता नवे सहकार धोरण बनविण्यात येणार असून, पुढील 20 वर्षांत सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली जाईल. आगामी काळात दोन लाख बहुउद्देशीय संस्था निर्माण करण्याचे ध्येय आहे. त्याचबरोबर सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सहकाराला न्याय देण्याची भूमिका
सहकार क्षेत्रावर अन्याय होतो, अशी नेहमी ओरड नेहमी केली जाते. मात्र, या काहीही तथ्य नाही. उलट आम्ही कर कमी केले आहेत. आम्ही सहकार विद्यापीठाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार क्षेत्राला पहिल्यांदा टॅक्समध्ये फायदा मिळाला आहे. याशिवाय सेंद्रीय शेती करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात करायला मोठी अडचण येते. आम्ही सहकारी तत्त्वावर अशी यंत्रणा निर्माण करत आहोत, ज्याद्वारे शेतकऱयांना थेट परदेशात आपला भाजी विकता येईल. शिवाय 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे आश्वासन आम्ही दिले असून, सध्या आपण 12 टक्के म़िश्रण करत आहोत. त्यामुळे साखर कारखान्यांना लाभ होणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
सहकार हा मुख्य म्हणजे राज्याचा विषय. आज सहकाराची चर्चा होते तेव्हा त्यात काय होणार, असा प्रश्न विचारला जातो. मात्र, 21 टक्के साखरेची निर्मिती सहकारी संस्थांमधून होते. दूध-गहू सहकारातून खरेदी होतो. धान्याची खरेदी सहकारी संस्थांकडून होते. ग्रामीण अर्थकारणाला सहकार चालना देते आणि मोठे करते. सहकार क्षेत्र बिनकामाचे नाही. याउलट पुढील दशकात सहकारिता क्षेत्र मोलाची भूमिका निभावेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.
किरण ठाकुर यांच्या हस्ते अमित शहांचा सत्कार
दरम्यान, या सहकार परिषदेचा आज समारोप झाला. या कार्यक्रमात ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या वतीने संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांनी अमित शहा यांचा सत्कार केला. व्यासपीठावर या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवर उपस्थित होते.