ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिक्षण मंडळाकडून राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असताना दौंडमध्ये शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. केडगावमधील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि.27) बारावीचा पेपर सुरू असताना शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी 9 स्थानिक शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालिंदर नारायण काटे (परीक्षा केंद्र संचालक), रावसाहेब शामराव भामरे (उपकेंद्र संचालक), प्रकाश कुचेकर, दिवेकर विकास, गोरगल शाम, कविता काशीद, जयश्री गवळी, सुरेखा होन आणि अभय सोननवर अशी विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन 1982, महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परीक्षा कायदा 1982 च्या कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.27) बारावीचा बोर्डाचा पेपर सुरू असताना भरारी पथकाने केडगाव येथील जवाहर विद्यालयात तपासणी केली. त्यावेळी काही वर्गांमध्ये विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळले. त्याला अप्रत्यक्षरित्या स्थानिक शिक्षक जबाबदार असल्याने भरारी पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात 9 स्थानिक शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : कार्यकर्त्यांचा उतावळेपणा; पुण्यात निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर