विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी कर्मचाऱ्यांच्या कामावर केले भाष्य
नवी दिल्ली : अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याऐवजी कार्यालयातून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी केले आहे. रिशद म्हणाले की, कार्यालयात काम केल्याने कर्मचाऱ्यांचा संवाद आणि भेटीगाठी वाढतात, ज्या मानवासाठी खूप महत्त्वाच्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण जगात तंत्रज्ञान कितीही प्रगत झालेले असले तरी लोकांना प्रत्यक्ष जोडण्यासाठी ते कामी येत नाही. प्रत्यक्ष भेटीतून होणारा संवाद हा फार महत्त्वाची भूमिका बजावतो. तेंव्हा प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन अधिक कार्यप्रवण होण्याची गरज असल्याचे मत प्रेमजी यांनी मांडले.
कार्यालयात परतावे
तथापि, कर्मचारी घरातून काम आणि ऑफिस अशा मिश्र पद्धतीने भविष्यात काम करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता कार्यालयाकडे यायला हवे. लोकांना घरून काम करण्याची सुविधा असली पाहिजे, या मताशी दुमत नाही पण त्यांनी यासोबत कार्यालयातही यायला हवे असे आपले प्रांजळ मत आहे, असे रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे.