भगवान प्रभू रामचंद्रांनी वनवासातील 14 वर्षे कसा प्रवास केला आणि कोणत्या महत्त्वाच्या ठिकाणी वास्तव्य केले याबद्दल ‘रामायण’मध्ये विस्ताराने वर्णन केले आहे. आजही ह्या पवित्र ठिकाणांना रामभक्त भेट देत असतात. या मार्गावरील प्रमुख स्थानांचा थोडक्मयात परिचय.
1) तमसा नदी तट : अयोध्येमधून निघाल्यानंतर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता रथामध्ये बसून सुमंत्रबरोबर(सुमंत) तमसा नदीच्या तटावर पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ अयोध्यावासीही चालत आले आहेत हे समजल्यावर त्या रात्री तेथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी नागरिकांना जाग येण्याच्या अगोदरच कोशलनगरी सोडून पुढे निघून गेले.
2) शृंगवेरपूर नगरी : त्यानंतर आपला मित्र निषादराज गुह याच्या या नगरातील वनामध्ये एक दिवसरात्र वास्तव्य केले. गुहने त्यांचे आदरातिथ्य केले. दुसरे दिवशी श्रीरामांनी सुमंत्रला रथासहित अयोध्येला परतण्याचा आदेश दिला. येथून पुढील मार्ग चालत जाण्याचा निश्चय केला.
3) प्रयाग : गंगा नदी पार करून निषादराज गुहबरोबर प्रयागचा सुंदर त्रिवेणी संगम पाहिला आणि भारद्वाज ऋषींच्या आश्र्रमात पोचले. तेथून निघताना श्रीरामांनी भारद्वाज ऋषींना आपल्याला राहण्यासाठी कोणते स्थान योग्य आहे विचारले. भारद्वाज ऋषीनी यमुनेच्या पलीकडे असलेले चित्रकूट स्थान योग्य असल्याचे सांगितले. येथूनच निषादराज गुह याला माघारी पाठवले आणि यमुना नदी पार केली.
4) चित्रकूट : येथे आल्यानंतर मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर लक्ष्मणाने बांधलेल्या पर्णकुटीत राहू लागले. येथे भरत भेट झाली आणि श्रीरामांना त्यांनी अयोध्येला परतण्याची विनंती केली पण श्रीरामांनी निश्चयपूर्वक नकार देत आपल्या पादुका देऊन परत पाठविले. यानंतर चित्रकुटला अयोध्येवरून लोकांची ये जा होत राहील म्हणून श्रीरामांनी ह्या ठिकाणाचाही त्याग केला.
5) दंडकारण्य : येथे आल्यावर प्रथम अत्री ऋषी आणि अनसूया यांची भेट घेतली. येथे अनसूयाने सीतेला पतिव्रतेचा उपदेश केला. त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणाने विरध राक्षसाचा वध केला. तत्पश्चात शरभंग ऋषींची भेट झाली आणि त्यांनी श्रीरामांच्या उपस्थितीत आपला देहत्याग केला. ह्याच ठिकाणी अनेक आश्र्रमांना भेटी दिल्या, साधूंना त्रास देणाऱ्या राक्षसांचा वध केला. त्याच काळात सुतीष्ण ऋषींची भेटही झाली आणि त्यांच्याकडून अगस्त्य मुनीबद्दल माहिती मिळवून त्यांचीही भेट घेतली. अशा प्रकारे वनवासाची 10 वर्षे दंडकारण्यामध्ये वास्तव्य केले. येथे पुढील वास्तव्यासाठी अगस्त्य मुनींनी गोदावरी नदीकाठावरील पंचवटी ही जागा श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना राहण्यास योग्य असल्याचे सांगितले.
6) पंचवटी : आता श्रीराम गोदावरी नदीच्या तटावर आपली पर्णकुटी बांधून राहू लागले. येथेच जटायूची भेट झाली. याच ठिकाणी शूर्पणखाने श्रीरामांना पाहिले आणि नंतर सीतेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लक्ष्मणाने तिचे नाक कापले (नासिक). त्यानंतर खर आणि दूषण या राक्षसांना तसेच त्यांच्या 14,000 सैनिकांना श्रीरामांनी ठार केले. काही काळानंतर रावणाने मारिचीला हरिणीचे रूप धारण करून श्रीराम आणि लक्ष्मण याना दूर घेऊन जाण्यास सांगितले. एकान्तवासाचा फायदा घेत रावणाने सीतेचे अपहरण केले आणि रथातून आकाशमार्गाने लंकेकडे निघाला. मारिचीचा वध केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण परतले तेव्हा त्यांना सीता आश्र्रमात दिसली नाही. मग त्या दोघांनी सीतेचा चौफेर शोध सुरू केला.
7) मातंग ऋषी आश्र्रम : सीता मातेचा शोध करत सर्वतीर्थ येथे श्रीराम मरणासन्न अवस्थेमध्ये असलेल्या जटायूला भेटले. जटायूने श्रीरामांना सांगितले की रावण सीता मातेला आकाशमार्गाने घेऊन दक्षिणेकडे गेला आहे. त्यानंतर जटायूने श्रीरामांच्या मांडीवरच रामनाम उच्चारत अंतिम श्वास घेतला. श्रीरामांनी जटायूचे अंतिम संस्कार केले. पुढे कबंध राक्षसाचा वध केला. मृत्यूपूर्वी श्रीरामांना त्यांनी सुग्रीवाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. वाटेत पंपा सरोवर येथे शबरीची भेट झाली.
8) ऋषीमुख पर्वत : येथे श्रीराम, लक्ष्मण यांना सुग्रीव, हनुमान आणि जाम्बवान (जांबुवंत) भेटले. सुग्रीवबरोबर मैत्री प्रस्थापित करत एकमेकांना मदत करण्याचे वचन दिले. त्यानुसार श्रीरामांनी सुग्रीवाला किष्किंधा परत मिळवून दिले आणि सुग्रीवाने सीतामातेचा शोध घेण्यास मदत केली.
9) प्रसवन गिरी पर्वत :भगवान श्रीरामांनी बालिवध केल्यावर सुग्रीवाला किष्किंधाचा राजा म्हणून नियुक्त केले तेव्हा सुग्रीवाने सीतामातेचा शोध करण्यासाठी श्रीरामांच्याकडे परवानगी मागितली. त्यावेळी नुकताच पावसाळा सुरू झाला असल्याने त्यांनी सुग्रीवाला पावसाळा संपेपर्यंत थांबण्याची सूचना दिली. त्या चार महिन्यात या पर्वतावरील गुहेत श्रीराम आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केले.
10) धनुष्यकोटी, रामेश्वर : पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर सीतामातेचा शोध सुरू झाला. सीतेला शोधून काढण्यासाठी सुग्रीवाला हनुमान अधिक समर्थ वाटला. श्रीरामांनीही आपली अंगठी सीतेचा शोध लागल्यावर तिला देण्यासाठी हनुमंताला दिली. पुढे जटायूचा भाऊ संपातीची भेट झाली आणि त्याने दिव्यदृष्टीने पाहून सांगितले की, रावणाने एका तऊण स्त्रीला अपहरण करून आणले होते आणि आकाशमार्गाने जात असताना तिने ‘राम-राम’ असा धावा करत आपले काही अलंकार जमिनीवर टाकले होते. हा रावण राक्षसांचा राजा आहे आणि त्याची राजधानी लंका दक्षिण तटापासून शंभर योजने दूर असलेल्या एका बेटावर वसलेली आहे. तेथे राक्षसिणींच्या पहाऱ्यात सीतामाता तुम्हाला सापडेल. त्यानंतर हनुमंतालाच त्याची भक्ती आणि क्षमता पाहून समुद्रपार करून सीतामातेला शोधण्याची सेवा देण्यात आली. त्यावेळेस सर्वजण रामेश्वर येथे आले. या ठिकाणी श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि या स्थानाला रामेश्वर असे नावही दिले. येथील महेंद्र पर्वतावरून हनुमंताने लंकेसाठी झेप घेतली आणि सीतामातेला भेटून परत आल्यावर श्रीरामांना लंका भेटीचा सर्व वृत्तांत कथन केला. धनुष्यकोटी येथे श्रीरामानी सागराला शरण आणले आणि त्याच्या साहाय्याने सर्व वानरांनी शंभर योजने लांब आणि दहा योजने ऊंद असा धनुष्यकोटीपासून ते श्रीलंकेतील मन्नार द्वीपला जोडणारा सेतू निर्माण केला. येथेच बिभीषणही श्रीरामांना शरण आला. त्यानंतर त्याच्या मदतीने लंकेवर आक्रमण केले.
11) नुवारा एलिया पर्वत : रावणाचा सुवर्णमहाल लंकेच्या मध्यभागी होता. त्याच्या आजूबाजूला थोड्या अंतरावर काही गुंफा होत्या. लंकेमध्ये आल्यावर श्रीरामाच्या सैन्याने इथे वास्तव्य केले. येथेच घनघोर युद्धामध्ये इंद्रजित, कुंभकर्ण आणि शेवटी बिभीषणाच्या मदतीने रावणाचा त्यांचे इतर बंधू, योद्धा आणि सेनापतीसहित वध केला. श्रीरामानी लक्ष्मणाच्या हस्ते बिभीषणाचा श्रीलंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक केला. त्यानंतर विरहाने व्याकुळ असलेल्या सीतामातेची सुटका केली. त्यानंतर आलेल्या मार्गानेच अयोध्येकडे परतीचा प्रवास पुष्पक विमानातून केला. वाटेत भारद्वाज मुनी आणि आपला मित्र निषादराज गुह यांची भेट घेतली. त्यानंतर नंदीग्राम येथे आपला बंधू भरत यांची भेट घेतल्यानंतर सर्वांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला. त्यांचे अयोध्यावासियांनी उत्साहाने स्वागत केले. तुकाराम महाराजही रामायणातील या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतात. केला रावणाचा वध । अवघा तोडीला संबंध ।।1।। लंकाराज्य बिभीषणा। केली चिरकाळ स्थापना ।।2।। औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा ।।3।। तुका म्हणे माझा दाता। रामे सोडविली सीता ।।4।। अर्थात ‘रामाने रावणाचा वध केला आणि त्याचा भवबंध तोडून टाकला. त्याचा भाऊ बिभीषण याला चिरंजीव केले आणि लंकेचे राज्य दिले. त्या श्रीरघुरामाच्या औदार्याचे मी काय वर्णन करू? ज्याने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली, तो श्रीराम माझे रक्षण करणारा दाता आहे. आपलीही अवस्था या जगामध्ये सीतेसारखीच आहे. आपणही भौतिक जगाच्या तुऊंगामध्ये अडकून पडलो आहोत. आपण जर श्रीरामनामाचा आश्र्रय घेतला तर आपली सुटका निश्चितच होईल. राम म्हणता तरे जाणता नेणता । हो का यातीभलता कुळहीन ।।1।। राम म्हणता नलगे आणिक सायास । केले महा दोष तेहि जळती ।।2।। राम म्हणे तया नये जवळी भूत ।कैचा यमदूत म्हणता राम ।।3।। राम म्हणता तरें भवसिंधुपार । चुके येरझारा म्हणता राम ।।4।। तुका म्हणे हेचि सुखाचे साधन । सेवी अमृतपान एका भावे ।।5।। अर्थात ‘कळत नकळत रामनाम घेतल्याने मनुष्य कोणत्याही जातकुळीचा असला, तरी तो संसारातून तरून जातो. जो रामनाम जप करतो त्याला आणखी काही करण्याची गरज नाही, त्याचे महादोषही जळून जातात. जो रामनामाचा जप करतो त्याच्याजवळ भूत येत नाही, मग यमदूतही कशाला येतील? रामनामाने जन्ममृत्यूच्या येरझाऱ्या चुकतात आणि मनुष्य भवसागर ओलांडून जातो. एकनिष्ठेने हे रामनामरूपी अमृत सेवन करावे हेच सुखाचे उत्तम साधन आहे.
-वृंदावनदास