आमदार सतेज पाटील यांचा घणाघात…सत्तेचा गैरवापर करत अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप…उच्च न्यायालयात दाद मागणार
राजाराम साखर कारखाना निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवित महाडिक आणि रडीचा डाव खेळल्याचा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला. सत्तेचा गैरवापर करत अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरत हे अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप करत निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
राजाराम कारखाना निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यावेळी दाखल उमेदवारी अर्जांवर घेतलेल्या हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया ही पूर्ण झाली. मंगळवारी 10 अर्ज अपात्र ठरविण्यात आले तर 33 अर्जावरील निकाल राखीव ठेवण्यात आला. बुधवारी सकाळी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी राखीव ठेवलेला निकाल जाहीर करत सतेज पाटील गटाचे 27 अर्ज अवैध ठरवले. या निकालावर सतेज पाटील गटाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. यानंतर अजिंक्यतारा येथे निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी कडून सोमवारी शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी झालेली सभासदांची गर्दी पाहून महाडिक गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सभासदांमध्ये जाऊन आपण निवडून येणार नाही, हे लक्षात आल्याने महाडिक गटाने हा रडीचा डाव खेळल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
सहकारातील काळा दिवस
निकाल राखीव ठेवल्यावरच आघाडीतील उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवणार हे लक्षात आले होते. तरीही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे कोणाच्याही दबावाला बळी न पडता या उमेदवारी अर्जांबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. तरीही दबाव तंत्रामुळे हा निर्णय घेतला आहे. आजचा निर्णय म्हणजे सहकारातील काळा दिवस असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
उमेदवार नव्हे तर चिन्ह बघून कामाला लागा
प्रमुख 27 उमेदवार अपात्र ठरले असले तरी अन्य उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यांच्या माध्यमातून पॅनेल करून काही झाले तरी हा लढा लढायचा आहे. त्यामुळे आता उमेदवार बघून नाही तर आघाडीचे चिन्ह बघून कामाला लागा असे आवाहन आमदार पाटील यांनी केली.
निवडणूक डी. वाय.ची नाही राजारामची
राजाराम कारखान्यात बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता डी वाय पाटील कारखान्याचा मुद्दा उपस्थित करून महाडिक गट सभासदांची दिशाभूल करत आहे. ही निवडणूक डी वाय पाटील कारखान्याची नसून राजाराम कारखान्याची आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. कारखान्यातील त्यांचा त्यांचा कारभार स्वच्छ असेल तर उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावीत असे आव्हान आमदार पाटील यांनी दिले.
शनिवारी प्रचाराचा नारळ फोडायचा
अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रचाराचा नारळ फोडायचा असे नियोजन होते. मात्र आजच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी किंवा शनिवारी प्रचाराचा नारळ फोडायचा अशी घोषणा आमदार पाटील यांनी केली.
महाडिक कसे घाबरले हे दाखवून द्या
कारखान्याच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने महाडिकानी हा रडीचा डाव खेळला आहे. महाडिक कसे घाबरले हे सभासदांना दाखवून द्या असेही आव्हान आमदार पाटील यांनी केले.
आता 24 तास राबणार
राजाराम कारखान्याची निवडणूक आता येलूर चे सहाशे सभासद विरुद्ध कोल्हापूरचे 12000 सभासद अशी होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी 14 तास राबायचे असे नियोजन होते. मात्र महाडिकानी केलेल्या आजच्या रडीच्या डावामुळे आता 24 तास राबणार असून विजय मिळवल्याशिवाय थांबणार नसल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
तर सभासदांमध्ये निवडणूक लावा
गोकुळ निवडणुकीसह राजारामच्या निवडणुकीतही मी स्वतःचा अर्ज भरला नाही. मात्र या दोन्ही संस्थांमध्ये महाडिकानी कुटुंबातील उमेदवार दिला आहे. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कुटुंबातील उमेदवारांचे अर्ज मागे घ्यावेत व सभासदांमध्ये ही निवडणूक लावावी असे आव्हान आमदार पाटील यांनी दिले.
लंगोट बांधून आखाड्यातून माघार
लंगोट बांधून राजाराम कारखान्याच्या आखाड्यात उतरलेल्या महाडिक आणि कंपनीने पराभव दिसताच आखाड्यातून माघार घेतली आहे. कारखान्यामध्ये खरंच सभासद हिताचा कारभार केला असेल तर असा रडीचा डाव खेळण्याची वेळ महाडिकांवर आला आली नसती. मात्र त्यांनी येथे सत्तेचा गैरवापर केला. अपात्र ठरवलेले 21 उमेदवारच त्यांना पराभवाची धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असेही आमदार पाटील यांनी सांगितले.