अटक बेकायदेशीर असल्याची सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याची टिप्पणी करून सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुऊवारी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (एनएबी) इम्रान खान यांची सुटका करण्यास सांगितले. तसेच तुम्ही न्यायालयाचा अनादर करू शकत नाही, असेही सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी सुनावणीदरम्यान सांगितले.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गुऊवारी इम्रान प्रकरणावर मोठी टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच त्यांना तासाभरात हजर करण्यास सांगितले. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांची अटक कायदेशीर आहे की बेकायदेशीर या मुद्यावर सुनावणी झाली. यादरम्यान सरन्यायाधीशांनी इम्रानला त्याच्या तब्येतीची विचारणा केली. त्यानंतर मला अटक झाली नाही, माझे अपहरण झाले. कोठडीत मारहाण करण्यात आल्याचा दावा इम्रान यांनी केला. इम्रानची बाजू समजून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी आम्ही तुम्हाला सोडण्याचे आदेश देत आहोत, असे स्पष्ट केले. मात्र, तुमच्या अटकेनंतर देशात झालेल्या हिंसाचाराचा तुम्हाला निषेध करावा लागेल, असेही बजावले आहे.
नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) आदेशानुसार मंगळवारी पाकिस्तानी रेंजर्सनी इम्रानला इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून अटक केल्यापासून देशातील परिस्थिती खूपच गोंधळलेली आहे. देशाच्या बऱ्याच भागात हिंसाचार सुरू असून नैसर्गिक मालमत्तांचे प्रचंड नुकसान केले जात आहे. इम्रान खान यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पाकिस्तानमधील बिघडलेली परिस्थिती आणि राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुऊवारी माजी परराष्ट्रमंत्री आणि इम्रान खान यांचे जवळचे सहकारी शाह मेहमूद कुरेशी यांना अटक केली. देशात निदर्शने सुरूच असून राजधानी इस्लामाबादशिवाय तीन प्रांतांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे.
इम्रान खान यांची ‘आपबीती’
सुटकेनंतर इम्रान खान यांनी गेल्या दोन-तीन दिवसातील घटना घडामोडीवरील भाष्य केले. मला दहशतवादी असल्याप्रमाणे अटक करण्यात आली. कारागृहामध्ये गुन्हेगारासारखी वागणूक दिली. लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. 145 हून अधिक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. माझ्या अटकेनंतर देशात काय झाले हे मला माहीत नाही. देशातील परिस्थिती बिघडू नये अशी माझी इच्छा आहे, असे स्पष्ट पेले.
सर्वोच्च न्यायालयाने ‘एनएबी’ला फटकारले
न्यायमूर्ती मिनाल्लाह यांनी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (एनएबी) फटकारले. आपल्याला कायदा हातात घेण्याची काय गरज होता? असा प्रश्न ‘एनएबी’ला विचारला आहे. अल कादिर ट्रस्ट प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत इम्रानला अटक करण्यात आली होती. अटकेपूर्वी जामीन घेण्यासाठी इम्रान खान इस्लामाबाद उच्च न्यायालयात पोहोचले असता त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र, न्यायमूर्ती मिनाल्लाह यांनी कडक शब्दात ताशेरे ओढताना ‘इम्रान खान यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली ती खपवून घेतली जाणार नाही.’ इम्रान खान यांच्या अटकेमुळे चुकीचे उदाहरण समोर येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हिंसाचाराचा विळखा कायम
पाकिस्तानमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सिंध प्रांत वगळता पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. पीटीआय नेते फवाद चौधरी यांना रात्री उशिरा आणि शाह महमूद कुरेशी यांना गुऊवारी सकाळी हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत इम्रानच्या पक्षाचे सुमारे 1900 नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 9 मे रोजी इम्रानला अटक झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 290 लोक जखमी झाले आहेत. बुधवारी इम्रान खान यांच्या समर्थकांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या लाहोरमधील घरावर हल्ला केला. 500 हून अधिक आंदोलकांनी शरीफ यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केली. तसेच घरावर पेट्रोलबॉम्ब फेकले. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस तेथे पोहोचताच आंदोलकांनी तेथून पळ काढला. मात्र, पाकिस्तान सरकारने या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही.