वार्ताहर,मुरगूड
व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते.सहकाराला संजीवनी देण्यासाठी निवडणुका टाळल्या पाहिजेत.सध्या साखर कारखाने आर्थिक संकटातून जात आहेत.निवडणुका न होण्यात ऊस उत्पादक,कर्मचारी यांचे कल्याण आहे.आजच्या स्थितीत निवडणुकांसारखी चैन कारखान्यांना परवडणारी नाही.यासाठी सर्व नेत्यांना भेटून मंडलिक व बिद्री साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंडलिक साखर कारखान्यांचे चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी केले.
मंडलिक व बिद्री साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हमिदवाडा येथील एसडीएम फौंडेशनमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे नूतन संचालक बी.जी.पाटील (वंदूरकर),गडहिंग्लज बाजार समितीचे नूतन संचालक विलास कांबळे (बोळावीकर) यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने सर्व साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात.मंडलिक कारखाना बिनविरोध व्हावा यासाठी संचालक मंडळाने आमदार मुश्रीफ यांची भेट घेतल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.बिद्री कारखान्यासंबंधी आमदार आबिटकर यांना सांगून दूर करावा असे सांगितले.त्याचा संदर्भ घेत के.पी.पाटील यांनी बिद्रीविषयी आपल्याशी बोलायला पाहिजे होते.त्यांनी बिनविरोधचा फार्म्युला सांगावा.ते प्रतिसाद देतील तसा आम्ही बिनविरोधसाठी निश्चित प्रयत्न करू,अशी ग्वाही मंडलिकांनी दिली.
तालुक्यात चार साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढली आहे.त्यामुळे आपल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याची गरज आहे.गाळप क्षमता किमान 6 लाख झाली तर फायदेशीर ठरणार आहे.त्यासाठी एकरी उत्पादन वाढवण्याचीही गरज आहे.कोरोना काळात निधी आणता आला नाही.मात्र शिंदे -भाजप सरकारमुळे 90 कोटींचा निधी खेचून आणल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अतुल जोशी (कागल),आर.डी.पाटील (कुरुकली),बी.जी.पाटील (वंदूर),एन.एस.चौगले,रामचंद्र चौगले (सोनाळी),शेखर सावंत, नामदेवराव मेंडके,अनिल सिद्धेश्वर (मुरगूड),भगवान पाटील (बानगे),महेश घाटगे,साताप्पा कांबळे (बस्तवडे),विलास कांबळे (बोळावी) यांनीही कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी संचालक बंडोपत चौगुले,प्रकाश पाटील,मारुती काळुगडे,शहाजी पाटील यांच्यासह सर्व संचालक,नारायण मुसळे,शहाजी यादव, केशवकाका पाटील,जयवंत पाटील,पांडूरंग भाट,विजय भोसले,सुहास खराडे,प्रा. संभाजी मोरे,रामचंद्र सांगले,आर.बी.पाटील,आर.एस. पाटील,आनंदराव फराकटे,प्रा.टी.एम.पाटील,कार्यकारी संचालक एन.वाय.पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक संचालक चित्रगुप्त प्रभावळकर यांनी केले. सूत्रसंचालन महादेव कानकेकर यांनी केले.
कारखाना आर्थिक संकटातून बाहेर
मंडलिक कारखान्याने सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा जादा दर दिला आहे. तथापी साखरसाठा, विक्री धोरण व थकहमी यामुळे अनेक कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्हा बँकांचे सहकार्य मिळाल्यामुळे आर्थिक संकटातून सावरू शकलो आहे. काहीं दृष्ट प्रवृत्तीनी कारखान्याबाबत अफवा पसरवल्याची खंतही मंडली.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्याचा विजय
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सत्याचा विजय असून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे संविधानिक आणि वैध सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे साप साप म्हणून भुई थोपटणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे वेगवान निर्णय घेत असून, यापुढेही लोक विकासाच्या अनेक योजना अंमलात येतील आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार यापुढेही यशस्वी कामगिरी करेल, असा विश्वास आहे.
खासदार धनंजय महाडिक
शिवसेना प्रमुखांच्या विचाराला बळकटी देणारा निकाल
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या सत्ता संघर्षावर महत्वपूर्ण असा निर्णय दिला आहे.हा निकाल आपल्या लोकशाहीत अपेक्षित असणारा निकाल आहे.अखेर सत्याचाच विजय झाला असून, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करणाऱ्या शिवसेनेला बळकटी देणारा हा निकाल आहे.
राजेश क्षीरसागर,कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ.
सरकारने पूर्ण क्षमतेने काम करावे
सत्ता नाट्या लवकरात लवकर संपुष्टात यावे आणि पूर्ण क्षमतेचे सरकार,राज्य कारभार करणारे असावे,अशी जनतेची अपेक्षा आहे.जनतेच्या कोर्टाऐवजी न्यायालयीन कोर्टामध्ये सरकार कोणाचे असणार हे निर्णय घेतले जातात.हे लोकशाहीसाठी घातक आहे.तरी आता पूर्ण क्षमतेने सरकारने काम करावे.पूर्ण मंत्रिमंडळाची उभारणी करून लोकहिताचे रखडलेले निर्णय तत्काळ मार्गी लावावेत
सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
तत्कालीन राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानुसार शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारी नाही.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.
संदीप देसाई, प. महाराष्ट्र अध्यक्ष आम आदमी पार्टी
पोपट मेला हे राजाला सांगायचे कोणी
सर्वोच्च न्यायालयाने पक्षप्रतोद गोगावलेंची निवड,राज्यपालांचे निर्णय बेकायदेशीर ठरवले.निवडणुक आयोगाच्या निर्णयावरही नापसंती दर्शवली, असे असताना 16आमदारांचा अपात्रतेचा निर्णय प्रलंबित राहिल अशा पद्धतीने तो विधानसभा अध्यक्षांकडे पाठविण्यात आला.हे म्हणजे राजाचा लाडका पोपट मेला हे राजाला सांगायचे कोणी,असा प्रकार आहे.
शिवाजीराव परुळेकर, राज्य महासचिव जनता दल
Previous Article१० मिनिटात तयार होणारा हेल्दी ओट्स चिला
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.