मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : बैलहोंगल प्रचारसभेत भाजपच्या खासदारांवर हल्लाबोल
बेळगाव : लोकसभेमध्ये राज्यातील भाजपचे 25 खासदार असूनही राज्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यात अपयशी ठरले आहेत. जनतेच्या संकटात आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने आवाज उठविणारा खासदार पाहिजे. यासाठी मृणाल हेब्बाळकर यांना पाठिंबा द्या, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बैलहोंगल विधानसभा मतदार संघातील मुरगोड, मल्लम्मनबेळवडी, बैलहोंगल नयानगर, येथे प्रचार करून त्या बोलत होत्या. जनतेच्या संकटकाळात धावून येणाऱ्या नेत्याची गरज आहे. जगदीश शेट्टर यांच्याकडून जिल्ह्याचा विकास साधणे अशक्य आहे. बेळगावच्या स्वाभीमानी जनतेने परकियांना या ठिकाणी संधी देवू नये. आपला जिल्हा दुसऱ्यांना देणे अशक्य आहे. असे त्यांनी सांगितले. जगदीश शेट्टर जिल्हा पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. आता मोदींच्या नावे मते मागत आहेत. जिल्ह्यासाठी आलेल्या योजना हुबळी-धारवाडला वळविल्या आहेत. आता बेळगाव आपली कर्मभूमी म्हणून सांगत मतांसाठी फिरत आहेत. जिल्ह्यासाठी त्यांनी काय योगदान आहे, असा सवाल करून मतदारांना हेब्बाळकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाकडून मोठे योगदान देण्यात आले आहे. भाजपकडून गेल्या 10 वर्षांत कोणता विकास साधला? असा सवाल करून केवळ खोटी आश्वासने देवून वेळ मारुन नेला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार महांतेश कौजलगी, महांतेश मत्तीकोप्प, काँग्रेस जिल्हाध्यक्ष कार्तिक पाटील, जुबेर गोकाक, रोहिणी बाबासाहेब पाटील, शिवरुद्र हट्टीहोळी, यल्लाप्पा मुरगोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.