प्रतिनिधी/सिंधुदुर्ग
कवी अजय कांडर यांच्या प्रकाशन पूर्व बहुचर्चित ठरलेल्या ‘युगानुयुगे तूच‘ दीर्घ कविता संग्रहाच्या पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आणि चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयच्या मराठी विभागातर्फे करण्यात आले आहे. सोमवार, (दि6) रोजी स.९ वा. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये सदर कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रा. शिवराज गोपाळे यांनी दिली.
लोकवाड.मय गृह मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेला ‘युगानुयुगे तूच‘ दीर्घ कवितासंग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर लिहिला गेला असून त्याच्या पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री तथा कथालेखिका नीरजा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि रिंगणचे संपादक सचिन परब, जेष्ठ कवयित्री प्रा. जयश्री बर्वे, आणि अजय कांडर आदी सहभागी होणार आहेत.
बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा अंतिमत: माणसाकडून माणसाकडे घेऊन जाणारी आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही महापुरुषाला एका जातीत बांधता येत नाही. जात –धर्म, स्त्री–पुरुष भेद नष्ट करण्यासाठी समग्र माणसाच्या कल्याणाचा विचार बाबासाहेबांनी केला आहे. मराठी कवितेत आजवर अधोरेखित न झालेली बाबासाहेबांची विचारधारा ‘युगानुयुगे तूच‘ या दीर्घ कवितेत मांडण्यात आली आहे. हा संग्रह प्रकाशित होण्यापूर्वीच त्याला वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीन दिवसात त्याच्या पहिल्या आवृत्तीसाठी वाचकांकडून नोंदणी करण्यात आली. त्यानंतर या संग्रहाची दुसरी आवृत्ती लगेच पुनर्मुद्रित करण्यात आली. या दोन आवृत्तीचे प्रकाशन आणि त्यावर विस्तारित चर्चा अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. डॉ. गोपाळे यांनी केले आहे.