तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात 78 धावांच्या एकतर्फी फरकाने नमवले
संकेत कुलकर्णी / पुणे
के. एल. राहुल, शिखर धवन यांची धडाकेबाज अर्धशतके, शार्दुल ठाकुर, मनिष पांडे यांची आतषबाजी व नवदीप सैनीची भेदक गोलंदाजी या बळावर भारताने श्रीलंकेला 78 धावांनी नमवत 3 सामन्यांची ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 6 बाद 201 धावा केल्या. यात राहुलने 54 धावा तर शिखरने 52 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात लंकेला 15.5 षटकात सर्वबाद 123 धावांवरच समाधान मानावे लागले. लंकेतर्फे धनंजया डीसिल्व्हाने सर्वाधिक 57 तर मॅथ्यूजने 31 धावा जमवल्या. पण, इतका अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी हाराकिरीच केली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले. भारताने आपल्या संघात तीन बदल केले. रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव यांच्या जागेवर संजू सॅमसन, मनिष पांडे आणि यजुवेंद्र चहल यांना संघात स्थान देण्यात आले. तर श्रीलंकेने देखील त्यांच्या संघात दोन बदल करत ऑलराऊंडर अँजेलो मॅथ्यूजला संघात स्थान दिले. राहुल आणि शिखर यांनी भारताच्या डावाला सुरूवात केली.
दुसऱया षटकात शिखर 2 धावांवर असताना डिपस्क्वेअरलेगला शनाकाने त्याला जीवदान दिले. त्यामुळे 2 षटकात 22 धावा अशी भारताची धडाकेबाज सुरूवात झाली. त्यानंतर या दोघांनी आक्रमक खेळ केल्याने पॉवर प्लेच्या पहिल्या 6 षटकांत भारताने बिनबाद 63 धावा जमविल्या.
भारताला मिळालेल्या या आक्रमक सुरूवातीनंतर भारत श्रीलंकेसमोर मोठे लक्ष उभे करणार हे स्पष्ट झाले होते. या दोघांनी आपली लय पुढे कायम ठेवत 10 षटकात 9.50 धावगतीने धावा करत बिनबाद 92 धावा केल्या. यात शिखरने आपला हरवलेला फॉर्म परत मिळवत 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर दुसऱया बाजूने राहुल त्याला चांगली साथ देत 29 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 40 धावांवर खेळत होता. शनाकाच्या 11 व्या षटकात शिखर डिपमिडविकेटला मोठा फटका मारणाच्या नादात झेलबाद झाला. त्याने 36 चेंडूत 52 धावा केल्या.
त्यानंतर विराटने संजू सॅमसनला संधी दिली. सॅमसनने सुरूवातीलाच षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले. परंतु हसरंगाने सॅमसनला पायचीत केले. सॅमसन बाद झाल्यावर विराटने आणखीन एक डाव खेळत मनिष पांडेला मैदानात पाठविले.
दुसऱया बाजुला के. एल. राहुलने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर तोही फारकाळ मैदानात तग धरू शकला नाही. कुसल परेराच्या फिरकीवर राहुल यष्टिचीत झाला. राहुलने 36 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या.
राहुल बाद झाल्यावर कर्णधार कोहलीने श्रेयसला मैदानात उतरविले परंतु तो देखील राहुल पाठोपाठ लगेचच बाद झाला. यावेळी 13 षटकांत भारताच्या 4 बाद 123 धावा झाल्या होत्या. शेवटी कर्णधार विराट कोहली स्वतः मैदानात उतरला आणि मनिष पांडेच्या साथीने त्याने भारताचा डाव पुढे नेला 17 षटकांत 167 धावा असताना आधी विराट 17 चेंडूत 26 धावा करत धावबाद झाला त्यापाठोपाठ वॉशिंग्टन सुंदर देखील बाद झाला होता.
धावफलक
श्रीलंका : गुणथिलका झे. वॉशिंग्टन सुंदर, गो. बुमराह 1 (2 चेंडू), अविष्का फर्नांडो झे. अय्यर, गो. शार्दुल 9 (7 चेंडू), कुशल परेरा त्रि. गो. सैनी 7 (10 चेंडूत 1 चौकार), ओशॅदो फर्नांडो धावचीत (पांडे) 2 (5 चेंडू), अँजिलो मॅथ्यूज झे. पांडे, गो. वॉशिंग्टन सुंदर 31 (20 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), धनंजया डीसिल्व्हा झे. बुमराह, गो. सैनी 57 (36 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), दसून शनाका झे. व गो. शार्दुल 9 (9 चेंडूत 1 चौकार), वणिंदू हसरंगा धावचीत चहल 0 (2 चेंडू), संदकन यष्टीचीत सॅमसन, गो. वॉशिंग्टन सुंदर 1 (2 चेंडू), लसिथ मलिंगा नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 5. एकूण 15.5 षटकात सर्वबाद 123.
गडी बाद होण्याचा क्रम
1-5 (गुणथिलका, 0.6), 2-11 (अविष्का, 1.3), 3-15 (ओशॅदो, 3.1), 4-26 (कुशल परेरा, 5.1), 5-94 (मॅथ्यूज, 11.2), 6-110 (शनाका, 13.3), 7-110 (हसरंगा, 13.5), 8-118 (संदकन, 14.6), 9-122 (धनंजया, 15.3), 10-123 (लसिथ, 15.5).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 2-1-5-1, शार्दुल ठाकुर 3-0-19-2, नवदीप सैनी 3.5-0-28-3, वॉशिंग्टन सुंदर 4-0-37-2, यजुवेंद्र चहल 3-0-33-0.