प्रतिनिधी/ पणजी
मेरशी ग्रामपंचायतीचे पंचायतसदस्य प्रकाश नाईक यांची आत्महत्या नसून तो घातपात आहे, असा दावा करीत आरोप असलेल्या दोघा संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नाईक कुटुंबियांनी घेतली आहे. पुटुंबियांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून पोलिसांच्या भूमिकेबाबतही कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे.
मयत नाईक यांनी मृत्यूपूर्वी एक एसएमएस आपल्या ग्रुपवर पाठविला होता. त्यात विल्सन गुदिन्हो व ताहीर यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्याकडून सतावणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्दय़ावर बोट ठेवून हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. मयत नाईक यांच्या मेरशी येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या कुटुंबियांनी गंभीरस्वरुपाचे आरोप केलेले आहेत. बहीण सरीता गोवेकर, भाऊ विनय नाईक व मुलगा प्रीतेश नाईक यांनी यावेळी पोलीस तपास आणि अन्य गोष्टींबाबत संशय व्यक्त केला.
पोलिसांचे तपासकाम संशयास्पद
ओल्ड गोवा पोलीस कुणाच्यातरी दबावाखाली काम करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बजावलेली कामगिरी ही संशयास्पद असल्याने हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी नाईक कुटुंबियांनी केली आहे.
सर्वप्रथम आपण घरी आले तेव्हा प्रकाश नाईक हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या पोटावर पिस्तूल होते. छातीवर मोबाईल होता. त्यांच्यावर चादर ओढलेली होती. जर त्यांनी आत्महत्या केली असती तर पिस्तूल पोटावर ठेवून चादर ओढणे शक्य आहे काय? असा प्रश्न सरीता गोवेकर यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकही आणले नव्हते. ज्या पिस्तूलातून गोळी प्रकाश नाईक यांच्या कानशिलात शिरली त्या पिस्तूलावर कुणाच्या बोटाचे ठसे आहेत की नाही त्याचा तपासही केला नाही. ठशांबाबत पोलिसांना विचारले असता पोलीस म्हणतात की, खोलीतील एसी सुरु असल्याने पिस्तूलावर पाणी आले त्यामुळे पिस्तूलावरचे ठसे मिळू शकले नाही. वास्तविक आपण खोलीत आले तेव्हा खोलीतील दोन्ही एसी बंद होत्या, असे सरीता गोवेकर यांनी पुढे बोलताना सांगितले.
आत्महत्या नसून तो घातपात
आपला भाऊ हा मेरशी परिसरातील अडलेल्या-नडलेल्या लोकांना मदत करीत होता. तो कोणत्याही संकटाला सहज सामोरा जात असे. तो इतक्या सहजासहज आत्महत्या करणे शक्य नाही, असे विनय नाईक यांनी सांगितले. या अगोदर त्यांना दोनवेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यांच्या सुरक्षेसाठीच त्यांनी पिस्तूल घ्यावे, असे आम्हीच त्याला सुचविले होते. खोलीत आपला भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तेव्हा खोलीचे मागचे दार उघडेच होते. म्हणूनच प्रकाश नाईक यांनी आत्महत्या केलेली नसून त्याचा घातपात केल्याचे विनय नाईक यांनी सांगितले. ज्यांच्या नावाचा एसएमएसमध्ये उल्लेख झाला आहे त्यांना त्वरित अटक करून त्यांची कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विल्सन गुदिन्हो हा मंत्री माविन गुदिन्हो यांचा भाऊ आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक राजकीय नेते हस्तक्षेप करीत असून पोलीसही त्यांच्या दबावाखालीच काम करीत आहेत, असा आरोपही विनय नाईक यांनी केला आहे.
तक्रार दाखल केल्यास तपास करणारः पोलीस
दरम्यान, प्रकाश नाईक यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपाबाबत पोलिसांना विचारले असता. पोलिसांनी सांगितले की, नाईक यांच्या मृत्यूबाबत अनेक संबधितांच्या जबान्या नोंद केल्या आहेत. त्यानुसार नाईक यांचा घातपात झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. शवचिकित्सा अहवालानुसार गोळी थेट डोक्यात शिरून मेंदूला मार लागल्याने नाईक यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंबियांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यांना जर कुणावर संशय असल्यास त्यांनी तशी तक्रार दाखल करावी त्यानुसार आम्ही तपास करू असे पोलिसांनी सांगितले आहे.