वाकरे/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी कोणत्याही वस्तूची खरेदी करताना ग्राहक म्हणून जागरूक असले पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थी जागरूक झाल्याशिवाय समाजातील ग्राहक जागरूक होणार नाहीत. म्हणून विद्यार्थ्यांनी ग्राहक जागरुकता सेमिनारचा उपयोग करून समाजाचे प्रबोधन करावे, असे आवाहन सांगरुळ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.
कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात कंजूमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई यांच्यावतीने आणि कॉमर्स, सांस्कृतिक व इंग्रजी विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘ग्राहक जागरुकता, आर्थिक साक्षरता, पैशाचे व्यवस्थापन आणि गुंतवणूक’ या विषयावरील सेमिनारच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. आसगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी. डी. कुरळपकर होते.
कंजूमर गाईडन्स सोसायटीच्या मार्गदर्शिका सौ. स्नेहल आपटे यांनी ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सजगपणे आर्थिक व्यवहार करावेत आणि जादा नफा देणाऱया भूलभुलैयाला बळी पडू नये, असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी योग्य पद्धतीने गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सौ. मिलन मेस्त्राr यांनी ‘ग्राहक जागरुकता आणि त्यांचे हक्क’ या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही वस्तूची खरेदी करताना त्याची पावती घेणे आवश्यक असल्याचे सांगून एक जागरूक ग्राहक म्हणून सर्वच बाबतीत सावधानता बाळगावी, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. डी. डी. कुरळपकर यांनी या सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्राहक चळवळ पुढे नेण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक प्रा. एस. पी. चौगले यांनी केले. प्रा. आसगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सेमिनारचा शुभारंभ करण्यात आला. आभार उपप्राचार्य बी. एम. कुंभार यांनी मानले. प्रा. डॉ. पी. बी. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. या सेमिनारमध्ये महाविद्यालयातील 200 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.