सावंतवाडी:
बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने बैलगाडी मालक आत्माराम बंड (60, रा. गेळे-आंबोली) गंभीर जखमी झाले. त्यांच्या छातीच्या बरगडय़ांना अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाचे सर्जन डॉ. पांडुरंग वजराटकर यांनी बरगडय़ांवर यशस्वी
शस्त्रक्रिया करत जीवदान दिले.
आंबोली-गेळे येथील शेतकरी आत्माराम बंड यांनी बैलगाडी व नवीन दोन बैल खरेदी केले होते. बैलगाडींना बैल बांधण्यात आले. अचानक बैल पळताच मालक रस्त्यावर पडले व बैलगाडीचे चाक त्यांच्या छातीवरून गेले. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. वजराटकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. तेथे शनिवारी बरगडय़ांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तातोबा गवस यांनी मदतकार्य केले.