जागतिक व्यापार परिषदेत विदेशमंत्र्यांचे प्रतिपादन : नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधी मांडली भूमिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीत आयोजित जागतिक व्यापार परिषदेला शनिवारी संबोधित करताना नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच विदेश धोरणाच्या मुद्दय़ांवर भूमिका मांडली आहे. सर्वांना स्वीकारणाऱया एक देशाचे नाव सांगा, असा कुठलाच देश जगाच्या पाठीवर सापडणार नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा आमचा अंतर्गत विषय असून याच्याशी कुठल्याच देशाचे देणेघेणे नाही, असे जयशंकर यांनी सीएएसंबंधी टीका करणाऱया देशांना सुनावले आहे. विदेश धोरणासंबंधी बोलताना जयशंकर यांनी आता जगातील भारताच्या खऱया मित्रांची ओळख पटत असल्याचे उद्गार काढले आहेत.
भारत जगाला नागरिकत्व सुधारणा कायद्यावर
स्वतःची बाजू पटवू शकला नाही तर काय होईल, असा प्रश्न विदेशमंत्र्यांना
विचारण्यात आला होता. प्रसारमाध्यमांच्या व्यतिरिक्तही जग आहे. जगातील
देशांच्या सरकारांसोबत मी जोडला गेलो आहे. ब्रुसेल्समध्ये 27
विदेशमंत्र्यांशी सीएएसंबंधी चर्चा केली होती. देशातील नागरिकत्वाच्या अटी
निश्चित करण्याचा अधिकार सरकार आणि संसदेला आहे. कुठलेच नागरिकत्व नसलेल्या
मोठय़ा संख्येतील लोकांना भारताने आश्रय दिला आहे. सीएएद्वारे देशविरहित
लोकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून याचे कौतुक होणे गरजेचे
असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाला चुकांचा इतिहास
या परिषदेत जयशंकर यांना संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या संचालकांच्या आक्षेपाबद्दल विचारणा करण्यात आली. जागतिक संघटना यापूर्वीही अनेक मुद्दय़ांवर चुकीची ठरली आहे. जम्मू-काश्मीरसंबंधी जागतिक संघटनेचा अहवाल पाहिला आहे. जागतिक संघटना अत्यंत सोयिस्करपणे सीमेपलिकडून दाखल होणाऱया दहशतवादाकडे दुर्लक्ष करतात. शेजारी देशात काय घडतेय याच्याशी जागतिक संघटनेला काहीच देणेघेणे नसल्याचे वाटते, अशा शब्दात जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला सुनावले आहे.
करार लाभदायक असावा
भारतीय दूतावासात आता लोकांचे स्वागत केले जाते. भारतीय उद्योजकांना सद्यकाळात मिळणारे सहकार्य काही वर्षांपूर्वी दिसून येत नव्हते. व्यापार करार सदैव वाणिज्यिक गणिताच्या हिशेबाने व्हावेत, राजनयिक नैतिकतेचा मुद्दा त्यात वरचढ ठरू नये. व्यापारी करार आणि त्याच्या अटी प्रत्येक देशाच्या भूमिकेनुरुप निश्चित व्हाव्यात. प्रत्येक करारात लाभ पाहिला जावा. भारताला जागतिक पुरवठा साखळीशी पूर्णपणे जोडले जाणे अद्याप शिल्लक असून सद्यकाळ यासाठी सुलभ नाही, असे उद्गार विदेशमंत्र्यांनी आरसेपसंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना काढले आहेत.
भारताचे बळ वाढतेय….
भारत स्वतःचे मित्र गमावत आहे का असा प्रश्न विदेशमंत्र्यांना विचारण्यात आला. भारताला आता खऱया मित्रांची ओळख पटत आहे. एकेकाळी जोखीम अधिक होती आणि आमची क्षमता तोकडी होती. अशा स्थितीत भारताने जगाशी जुळवून घेण्याचे धोरण अंगिकारले होते. पण भविष्यात असे करता येणार नाही. भारत जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लवकरच तिसऱया क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला मान मिळणार आहे. जग बदलत असल्याने आम्हाला अन्यप्रकारे स्थिती सांभाळावी लागणार असल्याचे जयशंकर यांनी उत्तरादाखल सांगितले आहे.