मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील सुमारे 7 ते 8 हजार खलाशी तसेच रोजगारासाठी विविध पदांवर जहाजांवर काम करण्यासाठी गेलेल्या व सध्या अडकलेल्या गोमंतकीयांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. कोविड -19 चा नवा एकही रुग्ण मंगळवारी सापडला नाही. 55 नमुने पृथःकरणासाठी पुन्हा एकदा पुण्यात पाठविण्यात आले. गोव्याच्या प्रयोगशाळेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच कोविडच्या संशयितांना विलगीकरणासाठी ज्यांना सक्तीने घरात राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यांच्या घरावर आजपासून स्टिकर चिकटविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
आल्तिनो येथे आपल्या सरकारी निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली. गोव्यातील सुमारे 8 हजार नागरिक विविध देशांमध्ये जहाजांवर खलाशी वा तत्सम कामांसाठी गेलेले आहेत. कोविडचा उद्रेक झालेल्या स्पेन आणि ईटली सारख्या राष्ट्रांमध्ये देखील गोमंतकीय असून ते अडचणीत सापडलेले आहेत. त्यांना तेथून सुरक्षित कसे हलवावे व गोव्यात कसे आणावे? याकरिता आपण केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधलेला आहे. त्याशिवाय आपण केंद्रीय गृहमंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे. या विषयावर पुढील दोन तीन दिवसात काहीतरी मार्ग निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या
प्रयोगशाळेत बिघाड
कोविड-19 च्या रुग्णांचे काही नमुने घेऊन पृथ्थकरणासाठी पुण्यात प्रयोगशाळेत पाठविले जात होते, त्याला वेळ लागत होता. त्यामुळे गोव्यात दोन दिवसांपूर्वीच प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. तथापि, येथील प्रयोगशाळेत अनेक तांत्रिक समस्या उद्भवल्या. अखेर राज्यातील 55 जणांचे काढण्यात आलेले नमुने पृथःकरणासाठी पुन्हा पुण्यात पाठविण्याची पाळी गोवा सरकारवर आली आहे. गोव्यातील प्रयोगशाळेत तज्ञांच्या मदतीला राज्यातील खाजगी क्षेत्रातील दोघां तज्ञांनीही पाचारण करण्यात आले. परंतु त्यात यश आले नाही.
घरांवर लावणार स्टिकर्स
कोविड -19 च्या संदर्भात संशयित व काही कारणास्तव सक्तीने घरात राहण्याचा आदेश दिल्यानंतरही काहीजण आरामात फिरतात असे कोणाच्या लक्षात आले तर त्वरित पोलीस, स्थानिक नगराध्यक्ष, सरपंच वा मामलेदारांना कळवा. त्यांना त्वरित ताब्यात घेऊन सरकारी केंद्रात नेऊन ठेवले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर ज्यांना घरात विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेले आहेत त्यांच्या घराबाहेर स्टिकर्स लावण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
90 ट्रक जीवनावश्यक सामान दाखल
राज्यातील जीवनावश्यक सामान संपुष्टात येत असल्याने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने व खाजगी क्षेत्रातील व्यापारी वर्गाने सुरू केलेल्या प्रयत्नांनंतर मंगळवारी एका दिवसात 90 ट्रक साहित्य घेऊन गोव्यात पोहोचले. यातील सुमारे 55 ट्रकांमधून भाजी आणण्यात आली व ती सर्वत्र वितरित करण्यात आली. 22 ट्रकमधून कडधान्य, तांदूळ व गहू आणण्यात आले. इतर काही ट्रकांमधून फळे आणण्यात आली.
कोविड -19 उपचारार्थ आणखी 120 कोटी
कोविड -19 च्या संदर्भात इस्पितळ तसेच आवश्यक उपाय योजना याकरिता राज्य सरकारने काल जिल्हा खाण निधीमधून 52 कोटी तर मंगळवारी गोवा लोह खनिज कायमनिधी योजनेतून आणखी 120 कोटी काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे कोविड-19 अंतर्गत आतापर्यंत जी आर्थिक तरतूद करण्यात आली त्यात रु. 170 कोटीची भर पडली. या अंतर्गत इस्पितळ उभारणे तसेच आवश्यक साधनसामुग्री खरेदी करणे यांचाही समावेश आहे. या लोहखनिज काय निधीमध्ये रु. 400 कोटी आहेत. त्यातील 30 टक्के निधी हा या योजनेसाठी वळविण्यात येणार आहे.