कॅम्प येथील 15 जणांना सिव्हिलमध्ये दाखल : 27 जणांची स्वॅब तपासणी : प्रशासनालाही फुटला घाम
प्रतिनिधी/ बेळगाव
नवी दिल्ली येथे निजामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन बेळगावला परतलेल्यांची संख्या वाढली आहे. उपलब्ध माहितीनुसार ही संख्या 100 च्या घरात असून बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाने 62 जणांचा शोध घेतला आहे. यापैकी 27 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनालाही घाम फुटला आहे.
एका कॅम्प परिसरातील 15 जणांना खबरदारी म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमधील क्वॉरंटाईन विभागात दाखल केले आहे. निजामुद्दीनहून बेळगावला परतलेल्यांचा शोध घेऊन ज्यांची प्रकृती चांगली आहे त्यांना 28 दिवस घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
मंगळवारी रात्रीपासूनच पोलीस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी या संबंधीची माहिती मिळविण्याचे काम हाती घेतले होते. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळपर्यंत दिल्लीहून परतलेल्या 62 जणांची माहिती मिळाली आहे. यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत.
मधुमेह, अतिरक्तदाब, अस्थमा आदींनी त्रस्त असलेल्या 27 वयस्क नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून परतलेल्या 51 हून अधिक जणांची आयएमए हॉलमधील फ्लू कॉर्नरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
तरुण भारतला मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प परिसरातून 6 फेब्रुवारी रोजी 15 जण दिल्लीला गेले होते. दोन दिवस निजामुद्दीनमध्ये वास्तव्य करून नंतर ते मेरठला गेले. 40 दिवस मेरठला राहिल्यानंतर विशेष बसमधून 16 मार्च रोजी ते दिल्लीला आले व रेल्वेने 19 मार्च रोजी बेळगावला पोहोचले आहेत. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील क्वॉरंटाईन विभागात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिलेल्या माहितीनुसार निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात कर्नाटकातून 300 हून अधिक जणांनी भाग घेतला होता. राज्य सरकारच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी दिल्लीहून परतलेल्यांचा शोध घेत आहेत. अनगोळ परिसरातूनही तबलिगी जमातसाठी 15 ते 20 जण दिल्लीला गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे.
बेळगाव जिल्हय़ातून आतापर्यंत 27 स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. यापैकी 21 अहवाल निगेटिव्ह आले असून अद्याप 6 अहवाल यायचे आहेत. दिल्लीहून परतलेल्या लोकांमुळे नजरेखाली ठेवलेल्यांची संख्या 493 वर पोहोचली असून यापैकी 242 जणांना 14 दिवसांसाठी घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. तर 26 जणांना 28 दिवसांसाठी घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
‘त्या’ 11 जणांवर नजर
इंडोनेशियातून आलेल्या व नवी दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज (बंगलेवाली मशीद) मध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन बेळगावला आलेल्या 11 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले असून जिल्हा प्रशासनाने त्यांचे पासपोर्ट ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या प्रकृती ठीक असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.