ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक (संगणक परिचालक) यांनाही २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मुश्रीफ म्हणाले, कोरोनाचा प्रदुर्भाव रोखणे, यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधन करणे, संशयीत रुग्णांना मार्गदर्शन व मदत करणे यासाठी गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक आदी सर्वजण अहोरात्र काम करीत आहेत. जीवाची जोखीम पत्करुन काम करणारे ग्रामीण पातळीवरील हे सर्व कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच आहेत.
केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ग्रामीण भागात या कामात इतर ग्रामीण कर्मचारीही कार्यरत असल्याने राज्य शासनाने ३१ मार्च रोजी परिपत्रक काढून गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना ९० दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय अधिक व्यापक करुन यामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांचाही समावेश करण्यात आला असून आता त्यांनाही ९० दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.