लेखी आदेशानंतरही टाळसुरे तलाठय़ांनी दिली तब्बल 15 दिवसांनी तक्रार
प्रतिनिधी/ दापोली
लॉकडाऊन सुरू असतानाही चिरेखाण सुरू ठेऊन उत्खनन केल्याप्रकरणी टाळसुरेचे तलाठी अलिमिया सय्यद यांनी चिरेखाण मालक व 4 मजुरांविरोधात दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोलीचे मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी 2 एप्रिल रोजी सकाळी 10 च्या सुमारास टाळसुरे येथील स्वप्नील प्रभाकर जाधव यांच्या चिरेखाणीवर जाऊन पाहणी केली असता त्यांना 4 कामगार कटर मशीन व पॉवर टिलर चालवत असल्याने निदर्शनास आले. मात्र शासकीय अधिकाऱयांना पाहून ते पळून गेले. तसेच या खाणीवरील झोपडय़ांजवळ 3 हजार चिरे आढळून आले. खानविलकर यांनी यासंदर्भात आपला अहवाल सादर केल्यावर तहसीलदार दापोली यांनी टाळसुरेचे तलाठी सय्यद यांना चिरेखाण मालकाविरोधात दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी, असे लेखी आदेश 2 एप्रिल रोजीच दिले होते. तरीही तलाठी टाळसुरे यांनी 15 दिवस होऊन गेले तरी दापोली पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. मात्र या बाबत प्रसारमाध्यमात वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठांच्या आदेशाने 21 एप्रिल रोजी सायंकाळी टाळसुरेचे तलाठी सय्यद यांनी चिरेखाण मालक स्वप्नील जाधव व चार कामगार यांच्याविरोधात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भादंवि 180 व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तक्रार दापोली पोलिसात दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.