ऑनलाईन टीम / जम्मू :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही नाट्यमय घडामोडीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आल्याने लोकांमध्ये यात्रेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तेवीस जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय अमरनाथ बोर्डाच्या बैठकीत उपराज्यपाल गिरीषचंद्र मुर्मू यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. या निर्णयासंदर्भात बुधवारी काही नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या माहिती संचालनालयानेही यासंदर्भात काढलेले पत्रक मागे घेतले आहे. त्यामुळे लोकांमध्ये यात्रेबाबत संभ्रम कायम आहे.
राजभवनच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबत एक पत्रक काढले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आजची स्थिती पाहून अमरनाथ यात्रा करणे शक्य नाही. येत्या काळात परिस्थितीचा अंदाज घेऊन अमरनाथ यात्रा आयोजनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.