फळबागायत, फुलशेती करणाऱया शेतकऱयांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. तरीही स्वतःचे रडगाणे न गाता शेतकरी दुसऱयांच्या सुखाचा विचार करत शेतीमध्ये राबत आहे
कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईत लॉकडाऊनला आज एक महिना पूर्ण झाला. कर्नाटकात बुधवारी मध्यरात्रीपासूनच लॉकडाऊन अंशतः शिथिल करण्यात आले आहे. हॉटस्पॉट व रेड झोनमध्ये लॉकडाऊन अधिक काटेकोरपणे राबवण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे सारा देश अनेक अडचणींना सामोरा जात आहे. कर्नाटकही याला अपवाद नाही. कष्टकरी, शेतकरी, भटके, कामगार, तृतीयपंथी, वारांगना आदी वर्गांनाही जगणे मुश्कील झाले आहे. समाजातील तळागाळातील माणसांनाही जगविण्यासाठी सरकार मोफत धान्यवाटप करत आहे. अनेक ठिकाणी घरपोच जेवण देण्याची व्यवस्थाही आहे. युवक मंडळे, वेगवेगळय़ा संघटना, दानशूर व्यक्तींनी तर आपल्या भाकरीतील एक तुकडा गरीबांसाठी काढून दिला आहे. या महामारीमुळे जितके जगणे मुश्कील केले आहे तितकेच माणुसकीचे दर्शनही घडविले आहे.
निर्मनुष्य रस्त्यांवर पशुपक्षी व प्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेक ठिकाणी तर जंगली प्राण्यांचे गावात दर्शन होत आहे. नद्या-नाले प्रदूषणमुक्त होत आहेत. कर्नाटकाची जीवनदायिनी कावेरी नदी सध्या स्फटिकासारखी स्वच्छ झाली आहे. 3 मे पर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. गुरुवारी दुपारी कर्नाटक आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या 443 वर पोचली आहे. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 141 जण उपचारांती बरे झाले आहेत. गुरुवारी दुपारपर्यंतचे हे चित्र! गेल्या आठवडाभरापासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. यामागचे खरे कारण वेगळेच आहे. कर्नाटकात कोरोनाग्रस्तांची संख्या घटली असा भास निर्माण झाला असला तरी प्रत्यक्षात प्रयोगशाळांमध्ये नमुना तपासणीचा वेग मंदावला आहे. पूर्वी केवळ बेंगळूर व शिमोगा येथे स्वॅब तपासणी केली जात होती. आता हुबळी-धारवाड व बेळगावलाही प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता स्वॅब तपासणीला वेग येईल. मगच खरे चित्र समोर येणार आहे.
रॅपिड टेस्टिंग किट ही चीनमधून मागवण्यात आली आहेत. या किटद्वारे तपासणी केलेल्या स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल संदिग्ध आहेत. त्यामुळेच या किटच्या माध्यमातून केली जाणारी तपासणी थांबविण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने स्वॅब तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे तपासणीचा वेग मंदावला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱया डॉक्टर, परिचारिका, पोलीस, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांवर काही नतद्रष्टांकडून हल्ले केले जात आहेत. एकीकडे जीवाची पर्वा न करता लढाई करायची आणि दुसरीकडे समाजकंटकांकडून होणारे हल्ले झेलायचे, अशी अवस्था या योद्धय़ांची झाली आहे. कर्नाटकातील सहा जिल्हय़ात अशा सातहून अधिक घटना घडल्या आहेत. रविवारी रात्री कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे तर पोलीस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांना पाठलाग करून मारहाण करण्यात आली. ज्या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतात, त्या परिसरात सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाते. आरोग्य, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या घरोघरी जाऊन माहिती घेतात. आणखी कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत का हे जाणून घेऊन त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करण्यासाठीच ही यंत्रणा कामाला लावली जाते. आता याच योद्धय़ांवर हल्ले वाढले आहेत. नागरी समाजाने शरमेने मान घालावी अशा या घटना आहेत.
केंद्र सरकारने कोरोना योद्धय़ांवरील हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा आणला आहे. आता हल्लेखोरांवर कायद्याने रोख लावण्याचा हा प्रयत्न आहे. खरेतर इतका कठोर कायदा करण्याची वेळच येऊ नये. पण काहींचा उद्दामपणा इतका वाढला की याची गरज भासली. हल्लेखोरांना सात वर्षे कारावास व पाच लाखपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना योद्धय़ांचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांवर आहे, ती जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. कर्नाटक सरकारने बुधवारी वटहुकूम जारी केला आहे. 3 वर्षे कारावास, 50 हजार दंडाची तरतूद करण्यात आली. मालमत्तांचे नुकसान करणाऱयांकडून दुप्पट दंड वसुलीची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अधिकाऱयांबरोबरच सरकारी अधिकाऱयांनाही आता कायद्याचे संरक्षण मिळणार आहे. एका पादरायनपूर येथील घटना लक्षात घेता कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभाग घेण्याऐवजी कोरोनाचा फैलाव कसा होईल, याचाच विचार समाजकंटक करत आहेत, असे दिसून येते. पन्नासहून अधिक संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचारी या भागात पोहोचले. त्यावेळी त्यांच्यावर व पोलिसांवर हल्ले करण्यात आले. यासंबंधी एका रात्रीत शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. ‘आमचे आमदार आम्हाला सांगू द्यात, तरच आम्ही क्वारंटाईन होणार’ अशी आडमुठी भूमिका घेण्यामागचा उद्देशच काय आहे याचा सरकारला शोध घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.
कोरोना महामारीमुळे सध्या सर्वच प्रार्थनास्थळांचे दरवाजे बंद आहेत. घरात बसूनच आपापल्या परीने प्रार्थना करायची वेळ प्रत्येकावर आली आहे. जात, पात, पंथ, धर्मभेदापलीकडची ही महामारी आहे. उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे प्रत्येकांना स्वतःला घरात कोंडून घ्यावे लागले आहे. या लॉकडाऊनच्या काळात एक वर्ग मात्र घाम गाळत आहे. जणू काही या मिळालेल्या संधीचा सदुपयोग करत आहे. तो म्हणजे शेतकरी वर्ग. कारखाने, सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद झाली तरी बळीराजा मात्र कामात आहे. म्हणून घरबसल्या अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा करणे सरकारला शक्मय झाले आहे. या लॉकडाऊनने अनेकांना जीवनाचे सत्यदर्शन घडवून दिले आहे. खिशात, तिजोरीत, बँक खात्यात कोटय़वधी रु. पडून असूनही जनतेला जे हवे ते मिळत नाही, अशी स्थिती आहे. शेतकरीही लॉकडाऊनमध्ये अडकला तर खायचे वांदे होणार आहेत आणि ही स्थिती शहरी नागरिकांवर ओढवू नये म्हणून बळीराजा आपल्या कुटुंबासह शेतामध्ये राब राब राबत आहे. फळबागायत, फुलशेती करणाऱया शेतकऱयांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. तरीही स्वतःचे रडगाणे न गाता शेतकरी दुसऱयांच्या सुखाचा विचार करत शेतीमध्ये राबत आहे आणि खरोखरच हा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा नक्कीच आहे.
रमेश हिरेमठ