प्रतिनिधी/ वडूज
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोक कलावंतांसाठी कोराना पार्श्वभूमीवर तीन हजार रूपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये जागरण,गोंधळ कलाकारांसह सुरसनई, बँड वादकांचा समावेश करावा अशी मागणी खटाव माण तालुक्यातील कलाकारांनी केली जात आहे.
याबाबतची माहिती अशी,चालूच्या वर्षी कोरोनामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. चालू वर्षी ऐन यात्रा , जत्रांच्या काळातच हा संसर्गजन्य आजार आल्याने लोकनाटय़ तमाशासह ऑकेस्ट्रा, जागरण, गोंधळ, सुरसनई,बँड वादन यासर्व उद्योगांवर संक्रांत आली आहे. या व्यवसायात काम करणाया बहुतांशी कलाकारांची हातावरची पोटे आहेत. यापैकी काही कलाकारांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीने तीन हजार रूपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजमध्ये फक्त लोकनाटय़ तमाशा कलाकारांचा समावेश आहे.
ङ खटाव माणमध्ये जागरण,गोंधळ पाटर्यांची संख्या मोठी
खटाव माण तालुक्यांचा विचार करता या दोन्हीच तालुक्यात फक्त पडळ येथे कै. बबनराव पडळकर यांच्या नावाने चालणारे लोकनाटय़ तमाशा मंडळ आहे. तर वडूज येथे तानाजी दळवी, शिवाजी दळवी, संभाजी दळवी यांच्या तीन वेगळ्या जयमल्हार जागरण पाटर्य़ा, कलेढोण येथे विलास बंडगर, म्हाळसाबाई मुरळी, बाळू वाघे यांच्यात तीन पाटर्या, येरळवाडीत सयाजी जाधव, मांडव्यात वसंतराव पाटोळे, पिंगळी येथे हणमंतराव काकडे, मलवडीत आण्णासाहेब मगर, संतोष महिराळ, दत्ता जाधव, कुळकजाई येथे शामराव वाघमोडे, दिलीप वाघमोडे, वावरहीरे येथे गुलाबराव पांडरे, संपत पांढरे, आंधळी येथे जोतीराम दळवी, दहिवडीत शालन मुरळी, लाडूबाई मुरळी, दशरथ दळवी, संजय दळवी, बोरजाई येथे दत्ता चव्हाण, छबुताई बोरजाईवाडीकर, अंभेरी येथील जागरण पार्टी अशा अनेक पाटर्य़ा आहेत. या पाटर्य़ांच्या माध्यमातून शेकडो छोटय़ा मोठय़ा कलाकारांची उपजिवीका होत असते. गेल्या दोन महिन्यांत या पाटर्य़ांना एकही सुपारी मिळालीच नाही.
: हातची कामे गेली…
याबाबत बोलताना वडूज येथील जयमल्हार जागरण पार्टीचे चालक तात्या उर्फ तानाजी दळवी म्हणाले, उन्हाळ्यातील मार्च ते जून या काळातील महिन्यांत गावोगावी जागरणांचा विशेष हंगाम असतो. एप्रिल महिन्यात काही कार्यक्रम बुक झाले होते. मात्र कोरोनामुळे ते रद्द झाले आहेत. या व्यवसायास आपल्या घरातील सुमारे आठ तर इतर कुटूंबातील पंधरा लोक निगडीत आहेत. या सर्व लोकांच्या उदर निर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
भोंडवे, जाधवांनी पुढाकार घ्यावा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खटाव गणाचे सदस्य आनंदराव भोंडवे हे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती आहेत. त्यांचा स्वत:चा निढळ येथे बँड आहे. तर पक्षाच्या भटक्या विमुक्त सेलचे अशोकराव जाधव यांचाही जुन्या काळात नामांकीत बँड होता. या दोघांना बँड व सुर सनई व्यवसायातील कलाकारांच्या अडचणीची जाणीव आहे. त्यामुळे वरील कलाकारांचा पँकेजमध्ये समावेश करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा वाकेश्वर येथील सनई वादक अशोकराव जावीर, साहेबराव केंगार यांनी केली आहे.