मंदिर परिसरातील व्यावसायिकांनाही मोठा फटका
जय उत्तम नाईक / पणजी
कोरोनाच्या अक्राळविक्राळ जबडय़ात पृथ्वीतलावरील केवळ मानवजातच सापडली नाही, तर देवदैवतेही या महामारीच्या विळख्यात आली आहे. कोरोनामुळे संपूर्ण मानवजात हताश, हतबल झाली. स्वतः विलगीकरणात गेली. त्याचबरोबर आपापल्या देवदैवतांनाही त्यांना विलगीकरणात ठेवावे लागले.
भारतात अशी काही मोठी मंदिरे आहेत, जेथे रोज लाखो भक्त भेट देतात. त्यायोगे मंदिरांच्या फंडपेटीत करोडोंच्या संख्येने निधी जमा होत असतो. गोव्यातही अशी असंख्य मंदिरे आहेत जी सध्या कॉरंटाईनमध्ये असल्याने त्यांचे लाखो-करोडोंचे नुकसान झालेले आहे. एवढेच नव्हे तर या मंदिरांवर अवलंबून असलेल्या अन्य कित्येक व्यावसायिकांनाही लाखोंचा फटका बसला आहे.
अनेक मंदिरांचे किमान 20 लाख रुपये नुकसान
राज्यात गावागावत आणि वाडय़ावाडय़ावर लहानमोठी शेकडो मंदिरे आहेत. त्यातील प्रमुख अशी पन्नास तरी मोठी मंदिरे आहेत. तेथे रोज हजारो भक्त भेट देतात. या भक्तांद्वारे फंडपेटीत टाकण्यात येणारा निधी हा प्रत्येकी रोज सरासरी एक लाख रुपये तरी खात्रीने असतो. यावरून गत महिन्याभरातील या मंदिरांचे प्रत्येकी किमान 20 लाख रुपये नुकसान झालेले आहे.
त्याशिवाय या मंदिरांवर अवलंबून असलेले व्यावसायिक म्हणजे, फुल विक्रेते, खण-नारळ-उदबत्ती आदी ओटी साहित्य विकणारे, देवदेवतांच्या मूर्ती-दोरे-हळद-पिंजर-चंदन यासारखे अन्य साहित्य विकणारे, जवळच्या परिसरात हॉटेल-खानावळ चालविणारे, चणे-खाजे विकणारे, यांचेही आतापर्यंत लाखोंचे नुकसान झालेले आहे.
फोंडा तालुक्यात सर्वाधिक मंदिरे
राज्यातील फोंडा तालुका हा देवदेवतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या एका तालुक्यातच गावागावत आणि वाडय़ावाडय़ावर मिळून लहानमोठी किमान 200 मंदिरे आहेत. त्यातील सुमारे दोन डझन मंदिरे मोठी आहेत. ही मंदिरे पर्यटनदृष्टय़ा जगप्रसिद्ध असल्याने रोज शेकडो भाविक भेट देत असतात. त्यायोगे लाखो रुपयांची उलाढाल तेथे होत असते.
अशा काही मंदिरात श्रीकामाक्षी (शिरोडा), श्रीसाईबाबा (बोरी), श्रीनवदुर्गा (बोरी), श्रीशांतादुर्गा (कवळे), श्रीरामनाथ (रामनाथी), श्रीमहालक्ष्मी (बांदोडा), श्रीनागेश (नागेशी), श्रीशांतादुर्गा (मडकई), श्रीगणपती (फर्मागुडी), श्रीमहालसा (म्हार्दोळ), श्रीमंगेशी (मंगेशी), श्रीतिरुपती बालाजी (कुंकळ्ये, कुंडई), श्रीदेवकीकृष्ण (माशेल), श्रीगणपती (माशेल), श्रीशांतादुर्गा (खांडेपार) यासारख्या मंदिरांचा समावेश होतो.
त्याशिवाय श्रीदामोदर (जांबावली), श्रीदामोदर (वास्को), श्रीविमलेश्वर (रिवण), श्रीचंद्रेश्वर (पारोडा), श्रीशांतादुर्गा (पुंकळ्ळी-फातर्पा), श्रीमल्लीकार्जुन (काणकोण), श्रीबोडगेश्वर (म्हापसा), श्रीलईराई (शिरगाव), श्रीमहालक्ष्मी (पणजी), श्रीसाईबाबा (पणजी) अशी अन्य प्रसिद्ध मंदिरेही आहेत. सध्या ही सर्व मंदिरे बंद आहेत. तेथील देवदैवते विलगीकरणात गेलेली आहेत. परिणामी नियमित, नित्याचे आणि कालोत्सव, जत्रा यासारखे अन्य वार्षिक व पारंपरिक सर्व सण, उत्सव बंद पडलेले आहेत.
जुने गोवेलाही फटका
जानेवारी ते मे हे पाच महिने गोव्यात पर्यटन व्यवसायाचे. देशविदेशातील हजारो लोक या काळात गोव्यात भेट देतात. त्यांची प्रथम पसंती असते ती समुद्रकिनाऱयांना भेट देण्याची. तिथे मनसोक्त मजा केल्यानंतर ते उर्वरित गोवा पाहण्यासाठी बाहेर पडतात. यातील अनेकांना जुने गोवेला भेट दिल्याशिवाय गोवा पाहिल्याचे समाधान होत नसते. त्यामुळे जुने गोवेत रोजच पर्यटकांची जत्रा भरलेली असते. त्यातून तेथेही मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते.
राज्यातील काही मंदिरात हल्लीच्या वर्षात दरमहा अमावास्या साजरी करण्यात येत आहे. हा उत्सव सुद्धा वार्षिक जत्रा शोभेल एवढय़ा थाटात साजरा होत असतो. त्यातून लाखोंची उलाढाल होत असते. कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत दोन अमावास्या होऊन गेलेल्या आहेत. त्या आयोजित करणे शक्य न झाल्याने या मंदिरांची अतिरिक्त लाखोंची नुकसानी झालेली आहे.
शिरगावातील देवी लईराईचा जत्रोत्सव रद्द
शिरगाव येथील श्री लईराईचा जत्रोत्सव हा गोव्यातील प्रमुख जत्रोत्सवापैकी सर्वात मोठा समजला जातो. पाच दिवसांच्या या जत्रोत्सवात पहिल्या एका रात्रीतच करोडोंची उलाढाल होते. त्यानंतर पुढील चार दिवस चालणाऱया कौलोत्सवातही गोव्यासह शेजारच्या राज्यांतील भाविक मोठय़ा संख्येने श्रीसायबिणीचा कौल, राखण घेण्यासाठी येत असतात. त्या दिवसातही लाखोंची उलाढाल होत असते.
जत्रोत्सवाच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत यंदा प्रथमच हा जत्रोत्सव होणार नाही. त्यामुळे हजारो धोंडांच्या अग्निदिव्याचा अनोखा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्याची संधी लाभणार नाही. या देवीचे उपासक ज्यांना ‘धोंड’ म्हणतात, त्यांना प्रत्यक्ष जत्रोत्सवाच्या पाच दिवस पूर्वी कठोर सोवळे पाळून व्रताचरण करावे लागते. त्या काळात ते केवळ फळे (किंवा मुगांचे कण्ण) खाऊन व्रत पाळतात. त्यासाठी प्रामुख्याने आंबे, कलिंगड, शहाळे यासारख्या फळांना प्राधान्य असते. ही फळे बाजारात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालेली असतात. जत्रेच्या दिवशी शिरगावातही मोठय़ा प्रमाणात कलिंगडे विक्रीस येतात.
या जत्रेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तेथे केवळ मोगरीची फुलेच विक्रीस येतात. सायबिणीला ही फुले फार आवडतात म्हणून दूरदूरवरून लोक मोगरीची फुले विकण्यासाठी शिरगावात येतात. त्याद्वारे त्यांची हजारो रुपयांची कमाई होते. त्यातून काही जणांच्या अर्ध्याअधिक वर्षाचा खर्च भागत असतो. अशा लोकांसाठी ही जत्रा म्हणजे पर्वणीच असते. यंदा जत्राच होणार नाही म्हटल्यावर वरीलपैकी काहीच दिसणार नाही. कोरोनाने माणसांसह देवदैवतांच्याही पायांना बेडय़ा घालून बंदीस्त करून टाकले आहे. परिणामी सर्वत्र उदासिनता पसरली आहे. अशा परिस्थितीत आपण श्रीचरणी एकच मागणे मागू शकतो, ‘जान है तो जहां है’, निदान पुढील वर्ष तरी सर्वांसाठी सुखाचे जाऊ दे