लॉकडाऊन नियम तोडणाऱयांवर कारवाई :, 6 लाखाच्यावर दंडाची वसुली
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी साऱया जग लढा देत आहे. मात्र, जिल्हय़ात काही तालुक्यांमध्ये कोरोनाची स्थिती संवेदनशील असताना देखील काही नागरिक विनाकारण गाडय़ा घेवून रस्त्यावर येतात. शेवटी पोलिसांना गर्दी हटवण्यासाठी कारवाईचा बडगा दाखवावा लागत आहे. यातूनच झालेल्या कारवाईमधून पोलीस दलाने जिल्हय़ात आतापर्यंत 200 चारचाकी, 4 हजारांवर दुचाकी जप्त केल्या असून या कालावधीत सुमारे 6 लाखाच्यावर दंडही वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याचे मोठे आव्हान सर्वांपुढे आहे. सध्या जिल्हय़ात कराडची स्थिती संवेदनशील होत आहे. तर आता साताऱयात देखील नवीन बाधित रुग्ण आढळून आला आहे. एकीकडे कोरोना मुक्त रुग्ण घरी जात असले तरी संसर्ग साखळी तोडण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. त्यासाठी लॉकडाऊन करुन ही संसर्ग साखळी तोडावी लागणार आहे.
त्यासाठी सातारा पोलीस दल दिवसरात्र मेहनत घेवून नागरिकांना समजावून सांगत आहे. काही गोष्टीत सवलतही दिली आहे. मात्र नेमक्या सवलतीच्या काळात गर्दी करण्याचा मुर्खपणा सुरुच आहे. वास्तविक सोशल डिस्टन्स पाळण्याची गरज असताना ते पाळले जात नाही. काही नागरिक उगाचच चारचाकी, दुचाकी घेवून बाहेर पडत होते. शेवटी मग पोलिसांनी वाहने जप्त करण्याची कारवाई सुरु आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाचा वाहन जप्तीचा धडाका सुरूच असून बुधवारी सातारा जिह्यात विविध पोलीस ठाण्यात 14 चार चाकी तर 48 दुचाकी गाडय़ा जप्त करण्यात आल्या. आज अखेर जप्त करण्यात आलेल्या चार चाकी वाहनांची संख्या 179 तर दुचाकी वाहनांची संख्या 4061 झालेली आहे. यामध्ये एक हजार 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर वाहनांना केलेल्या दंडापोटी आजपर्यंत 6 लाख 41 हजार रुपये वसूल करण्यात आलेले आहेत.
हे सर्व कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठीच करण्यात येत आहे. नागरिकांनी घरात बसून कोरोना संसर्गापासून स्वःतासह कुटुंबाचे रक्षण करावी ही पोलीस दलासह जिल्हा प्रशासनाची भावना आहे. या कारवाई करताना पोलीस दलाला फार मोठा आनंद होत नाही. काही दिवस नागरिकांनी लॉकडाऊन यशस्वी करुन संसर्ग साखळी तोडल्यास सर्वांचा भविष्यकाळ चांगला राहणार आहे. तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही प्रकारे आपले वाहन बाहेर काढू नये अन्यथा ते जप्त करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.