प्रतिनिधी/रत्नागिरी
जयगड किनाऱ्यापासून 11 नॉटिकल मैल अंतरातील खोल समुद्रात मुंबईतील मच्छिमारी नौका सोमवारी मध्यरात्री भरकटली होती. पण त्या नौकेला रात्रीपासून सुमारे 8 तास चाललेल्या ऑपरेशननंतर टॅगच्या सहाय्याने किनाऱ्यावर सुखरूप आणण्यात यश आले.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने मच्छीमारीत व्यत्यय येत आहे. सोमवारी 18 मे रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाला एक मच्छीमारी नौका खोल समुद्रात अडकुन पडल्याची खबर मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश रामभाऊ दळवी यांनी तत्काळ ही माहिती मेरीटाईम बोर्डाचे कॅ. संजय उगलमुगले यांना दुरध्वनीवरुन ही माहिती दिली.
मुंबई येथील ‘विजया महेश्वरी’ या मच्छीमारी नौकेचे रात्रीच्या सुमारास अचानक इंजिन बंद पडले. नौकेवर तांडेलांसह अकरा खलाशी होते. त्यांनी खोल समुद्रातच नांगर टाकून मदतीसाठी प्रयत्न सुरु केले होते. चक्रीवादळामुळे समुद्रही खवळलेला होता. पाण्यात नौका हेलकावे खात होती. नांगरावर जास्तकाळ नौका उभी राहणेही धोकादायक ठरली असती. अनर्थ टाळण्यासाठी नौकेवरील तांडेल सुदेश दाभी यांच्याकडून मदतीसाठी प्रयत्न सुरु केले होते.
सागरी सुरक्षा दलाकडून संदेश मिळाल्यानंतर कॅ. उगलमुगल यांनी तत्काळ मदतीसाठी पावले उचलली. तटरक्षक दलाचे कमांडन्ट आणि जेएसडब्ल्यूचे कॅ. रविचंद्रन यांच्याशी संपर्क साधला. तटरक्षकची नौका घटनास्थळाकडे रवाना झाली. पाठोपाठ नौका ओढून आणण्यासाठी आवश्यक असलेली जेएसडब्ल्यूची टग बोट पाठविण्यात आली.
मध्यरात्रीपासून वार्याचा वेगही वाढला होता. लाटांमुळे घटनास्थळी पोचण्यात अडथळे होते. प्रतिकुल परिस्थितीमध्ये मच्छीमारी नौकेच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कार्यरत होत्या. इंजिन बंद पडल्यामुळे टग बोटीच्या साह्याने विजया महेश्वरी नौका मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जयगड येथील महाराष्ट्र मेरी टाईमच्या जेटीला सुखरूप आणण्यात आली आहे. या ऑपरेशनमुळे मोठा अनर्थ टळला आणि अकरा मच्छीमारांना वाचवणे शक्य झाले. ती नौका आणि खलाशी जयगड बंदराच्या ठिकाणी सुरक्षित असल्याचे कॅ. उगलमुगले यांनी सांगितले आहे. या बचाव कार्यात येथील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उघलमुगले यांच्या मार्गदर्शनाखाली जेएसडब्ल्यू पोर्टचे प्रमुख, तटरक्षक दल आणि पोलिसांचे सागरी सुरक्षा दल आणि जिल्हाप्रशासनाने यात महत्त्वाची भुमिका बजावली.