ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
कोरोना नंतर आता ‘अम्फान’ चक्री वादळाने पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे. त्यामुुळे बंगालमधील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर ताशी 102 किमी. वेगाने वारे वाहत आहेत.
या बाबत अधिक माहिती देताना एनडीआरफ चे डीजी एस एन प्रधान यांनी सांगितले की, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी आमचे लक्ष असून आता पर्यंत ओडिशा मध्ये 20 तर पश्चिम बंगालमध्ये 19 पथके तैनात केली आहेत. ‘अम्फान’ चक्री वादळ पश्चिम बंगालच्या सुंदरवन प्रदेशाकडे सरकत आहे.
पुढे ते म्हणाले, फैनी वादळाच्या अनुभवावरून आम्ही आमच्या टीम सोबत झाडे आणि पोल कापण्याची सामग्री ठेवली आहे. त्यामुळे या वादळानंतरची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्हाला मदत मिळेल.
पुढे ते म्हणाले, पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील साडे सहा लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील 5 लाख आणि ओडिशातील 1 लाख 58 हजार 640 लोकांचा समावेश आहे.
दरम्यान, ‘अम्फान’ चे संकट पाहता हवामान खात्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, मिजोरम, मणिपूर आणि जम्मू-काश्मीरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.