प्रवासात योग्य ती काळजी न घेतल्याने संख्या वाढतेय,
विशाल कदम/ सातारा
कोरोनाचा चौथा लॉकडाऊन सुरू झाला आहे. जसे सातारा जिह्यात परप्रांतीय अडकले होते तसे जिह्यातील इतर राज्य आणि मुंबई, पुण्यात अनेकजण अडकले आहेत त्यांनाही आपल्या गावाला जाण्यासाठी वेध लागले आहे. भुकेने मरण्यापेक्षा गावाला जाऊन सुखाने जगू, असे स्वप्न पहात काहीजण परवाना घेऊन तर काहीजण विनापरवाना घेऊन सातारा गाठत आहेत. गावागावांत दक्षता घेतली जात आहेच पण मुंबई, पुण्यातून निघालेल्या नागरिकांना सातारा जिह्यात आल्यावर बाधा होतेच कशी?, क्वारंटाईनचा शिक्का मारताना प्रशासन काळजी घेत नसावे अशी भीती व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, प्रवासात काही चुका होत असाव्यात अशी ही चर्चा जिह्यात सुरू आहे.
प्रत्येक गाव आणि शहरातला कोणी ना कोणी बाहेरच्या राज्यात बाहेरच्या जिह्यात नोकरी व कामानिमित्त आहे. 22 मार्चपासून लॉकडाऊन असल्याने सगळे व्यवहार बंद आहेत. ग्रामीण भागात नागरिकांना शेतात तरी जाता येते पण शहरी भागात प्लॅट किंवा खोलीत किती दिवस राहणार?, भाजीपाला, पीठ अशा आवश्यक साहित्य सरकारने जरी उपलब्ध करून दिले असले ते खरेदीसाठी खिशात पैसे नाहीत. खानावळी बंद झाल्याने थांबून करायचं काय म्हणून मिळेल तसे मिळेल त्या वाहनाने गावच्या ओढीने मंडळी निघत आहेत. एवढे दिवस पुण्या मुंबईत चांगली ठणठणीत असणारी ही मंडळी गावच्या दिशेने निघतात तेव्हा वाटेत, प्रवासात अनेक अडथळे पार करत कसे बसे गावच्या ओढीने येतात. जिह्यातील सीमेवर त्यांची तपासणी होते किंवा गावात, भागात होते. क्वारंटाइनचा हाती गडबडीत शिक्का मारला जातो. त्याचवेळी काळजी घेतली जात नाही अशी काहींनी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच प्रवास करताना जे वाहन वापरले ते निर्जंतुक होते का?, अशी ही भीती व्यक्त होत असून सातारा जिह्यात आपल्या गावी पोहचल्यावर नेमकी तपासणी केली जाते. त्या तपासणीमध्ये अनेक जण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना प्रवासात तर होत नाही ना?, क्वारंनटाईनचा शिक्का मारताना निर्जंतुक केला जात नाही ना, अशा अनेक शंकाकुशंका पुण्या, मुंबईतल्या सातारकर नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
शाळा झाल्या हाऊसफुल्ल
सातारा जिह्यात जिल्हा परिषदेच्या अडलेल्या 2772 शाळा तर काही ठिकाणी खासगी शाळा क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतल्या आहेत. शाळेच्या खोल्यात मुंबई, पुण्यावरून आलेल्या नोकरदारांची राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे जिह्यातील बहुतांशी सर्व शाळा हाऊसफुल झाल्या आहेत.
गावागावात भितीचे वातावरण
जे हाल शहरातल्या नागरिकांचे होत आहे तेच हाल गावातील नागरिकांचे होऊ नये याकरता गावच्या दक्षता कमिटय़ा काळजीपूर्वक काम करताना दिसत आहेत. मात्र, काही मुंबईकर हे कोण आपल्याला काय करते आहे आपलाच सरपंच, आपलाच ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणून मग कुठं गावात बरमुडय़ावर खालच्या आळीपासून वरच्या आळीपर्यंत विनाकारण फिरत बसतात. विहिरीवर ग्रुपने पोहायला जातात. माळावर क्रिकेटचा डाव टाकतात तर कुठे पत्ते कुठंत बसतात. रानात पाटर्य़ा करतात. तपासणीला कोण आलं तरी त्याला मुंबईची भाषा सांगतात. त्यामुळे या मुंबई-पुणेकरांच्या उचापतीमुळे जरी आपले असले तरी गावागावांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका प्रवाशाने व्यक्त केली खंत
पुण्यावरून साताऱयाला आलेल्या एका प्रवाशाने खंत व्यक्त केलेली आहे. त्याने सांगितले की, अतिशय घातक परिस्थितीत प्रवासी व्यक्तीची तपासणी केली जात आहे. मेडिकल सर्टिफिकेटस असतानाही प्रवाशांना गर्दी, उन्हात रांगेत उभं केलं जात आहे. त्यामुळे ज्याला कोरोना आजार नाही त्यालाही आजाराची लागन होऊ शकते. इथे उन्हात उभं करून लांबच्या लांब रांगा लावून एक मिनिटामध्ये तपासणी करून कसं ओळखायचं कोण पॉझिटीव्ह कोण निगेटिव्ह?, नाहक क्वारंटाईनचे शिक्का मारून साताऱयात प्रवेश दिला जात आहे. प्रवाशांना त्याच्या गावात सामाजिक व कौटुंबिक बहिष्काराला तोंड द्यावे लागत आहेत. क्वारंटाईन शिक्का मारल्यावर गावात त्या व्यक्तीला नाहक अडचणी उभ्या राहत आहे. देशाची जनता संकटात परिस्थितीत देश कार्यासाठी कटिबद्ध आहे. पण काही सुधारणा होण्याची गरज आहे. काही लोक आपल्या कुंटुबाच्या अडकलेल्या व्यक्तीला आणण्यासाठी जातात त्यांनाही शिक्का मारल्यावर आपल्या शहरात, सोसायटीमध्ये अडचणी उभ्या राहतात.