बेळगाव :/ प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे तब्बल दीड महिना बंद असलेली बाजारपेठ मागील आठवडय़ापासून सुरळीत सुरू झाली आहे. मध्यंतरी वाहतूक बंद असल्यामुळे बाजारपेठेत माल उपलब्ध होत नव्हता मात्र आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने मालवाहू वाहनांतून माल येण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजारपेठ सुरळीत सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
शहरातील गणपत गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, कलमठ रोड, मारूती गल्ली आदी ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. बाजारपेठ पूर्वी प्रमाणे सुरू झाली असली तरी जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखालीच बाजार करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून संपूर्ण वाहतुक व्यवस्था बंद होती. त्याबरोबरच आंतरराज्य वाहतुकही बंद होती. त्यामुळे बाजारपेठेत येणारा माल थांबला होता. त्यामुळे या काळात दुकानदारांबरोबर सर्व सामान्यांचे हाल झाले होते.
सध्या काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने बस वाहतुकही सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱया नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे पूर्वी प्रमाणे बाजारात गर्दी होत आहे. सकाळी 8 सांयकाळी 6 पर्यंत दुकाने सुरू असली तरी दुपारी 3 पर्यंत खरेदी वर्दळ वाढलेली पहायला मिळत आहे. दुपारनंतर अवजड वाहतुकीस परवानगी देण्यात आली असून माल उतरून घेण्यासाठी वेळ दिला जात आहे. मध्यंतरी वाहतुक बंद झाल्याने बाजारपेठेत माल उपलब्ध नव्हता त्यामुळे किराणा मालाचे दर वाढले होते. मात्र सध्या लॉकडाऊन पूर्वी जे दर होते त्याप्रामणे मालाची विक्री होताना दिसत आहे. शहरातील काही रस्ते वगळता संपूर्ण शहर वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. सध्या आंब्याचा हंगाम आहे. त्यामुळे विविध जातीचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. आंब्याची आवक वाढली असून ठिक ठिकाणी किरकोळ विपेते आंब्याची विकी करताना दिसत आहेत.