तुम्ही महाराष्ट्रात कुठे आहात असे विचारले आणि त्याला ड्रायव्हिंग सीटवर असे उत्तर आले तरच समजावे की तुम्हाला काहीतरी महत्त्व आहे! अन्यथा तुम्ही म्हणजे फक्त एक घटक…. ना निर्णयाचे अधिकार, ना कामाची संधी! ‘उपस्थिती हाच अहेर’ या सदरात तुम्ही मोडता किंवा तुम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या साथीदारांनीच खूप त्रस्त केले आहे असे खुशाल समजून चला! माजी मुख्यमंत्री नारायण राणे असोत, पृथ्वीराज चव्हाण असोत किंवा ताजे ताजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत. या तिघांच्याही बाबतीत यातील बहुतांश वक्तव्ये तंतोतंत पटतील. तिघांचेही महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पूर्वी फार चांगले संबंध होते. पण आता….? राणे यांच्याशी ठाकरेंचे बिनसले त्याला आता दीड दशक होत आले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे आणि ठाकरेंचे नाते फार सख्याचे नसले तरी ताणलेलेही नव्हते. सरकार स्थापन होताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष नेत्यांना समजावले होते त्यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व आपल्या मंत्रिमंडळाची शोभा वाढवेल असे ठाकरेंना वाटायचे. फडणवीस आणि ठाकरेंचे ‘टय़ूनिंग’ तर महाराष्ट्राला
सर्वश्रुत आहे. भाजप-शिवसेनेची तुटलेली युती जोडून ठेवण्यात दोघांनी पाच वर्षे एकमेकाला समजून घेत, सरकार पाडण्याची किंवा जबडय़ात हात घालण्याची लोकप्रिय धमकी एकमेकाला देत पुन्हा युती केली आणि निवडणुका लढविल्या. पण, मुख्यमंत्रीपदावरून बिनसले ते आता ‘सावत्र’ बनले! तीन माजी मुख्यमंत्र्यांपैकी राणेंची अवस्था ते जातील त्या पक्षात दयनीयच असते. एखाद्या ‘ऑपरेशन’ पुरतीच प्रत्येक पक्षाला त्यांची आठवण होते. पण, चव्हाणांचे तसे नाही. ते पक्षात महत्त्व बाळगून आहेत. (फक्त राज्यातील नेत्यांना त्यांचा राग येतो.) फडणविसांची स्थिती चव्हाणांच्याहून अधिक भक्कम आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. राज्यातील सर्व ज्येष्ठांना डावलून त्यांनी सर्वाधिकार त्यांच्या हाती ठेवले आहेत. परिणामी इतर सर्वच जण त्यांचा पतंग कापण्याच्या विचारात आहेत. तर, फडणवीस सरकारचा पतंग कापण्याच्या कामात व्यस्त आहेत. तो डाव आणखी एक माजी मुख्यमंत्री फोल ठरवत आहेत. त्यांचे नाव शरद पवार!महाराष्ट्रात काँग्रेस ड्रायव्हिंग सीटवर नाही. तिथे शिवसेनेचे सरकार आहे आणि आम्ही त्या आघाडीला पाठिंबा दिला आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर पवार यांच्या राज्यपाल भेटीकडे आणि मातोश्रीवर जाऊन केलेल्या चर्चेला एका वेगळय़ाच संशयी नजरेने पाहिले जाऊ लागले. राज्यपालांनी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे असे पवार यांनी सांगितले. पण, पत्रकारांना ते ऐकू आले नाही. कारण, त्या आधीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एक दूरध्वनी संभाषण अचानकपणे विविध वृत्तवाहिन्यांवर फिरले होते. त्यात त्यांनी राज्यात आमची नव्हे तर शिवसेनेची सत्ता आहे असे म्हटले होते. ते वक्तव्य नेमके फडणविसांची राज्यपाल भेट आणि आंदोलनाची हवा असतानाच कसे बाहेर पडले हे कळायच्या आतच सत्तापक्षात काहीतरी जोराचा वाद सुरू आहे, लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत शरद पवार बरेच आग्रही आहेत, आणि मुख्यमंत्री सरसकट लॉकडाऊन हटवायला तयार नसल्याची चर्चा सुरू झाली. त्यात देशभरातील राजभवने हल्ली ‘संशय सदन’ बनलेली असल्याने मग तिथे कोणी गेले की सरकारच्या भवितव्याची काळजी वाहिली जातेच! त्यात भाव खाऊन गेले ते कोकणचे सुपुत्र! राज्यपालांनी त्यांना भेट देणे फारच महत्त्वपूर्ण होते. कारण आधी लोकांच्या नजरेत संजय राऊत यांची राज्यपाल भेट भरली होती. त्यात त्यांनी राज्यपालांना कोपरापासून हात जोडून दंडवत केल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्यावर ‘उतारा’ पाहिजेच होता. तो कोकणातून आला! राणेंनी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. ही मागणी करून आपण भाजप नेत्यांना ‘हर्ट’ केले आहे हे राणेंच्या गावीही नसावे. पण, त्यामुळे पवारांच्या भेटीगाठींनी दबक्या आवाजात सुरू झालेल्या राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेला मात्र हवा मिळाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद एक आगळे सिंहासन आहे. देशातील सर्वाधिक उत्पन्न देणारे, उद्योगपतींना जोडून असणारे! त्यामुळे हे सिंहासन आपले किंवा आपल्या इशाऱयावर चालावे असे कोणाला वाटणार नाही? त्यामुळे अनपेक्षितरित्या त्या सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीला सहन कोण करणार? त्यात तर देशाच्या इतर भागात ऑपरेशन कमळ यशस्वी झाले असताना आणि कोरोना काळातही मध्य प्रदेशसारखे राज्य हाती आले असताना महाराष्ट्र मिळत नाही याची अस्वस्थता ही असणारच. देवेंद्र फडणवीस यांना घाई झाली नसली तरी सर्वांनाच तसे वाटत नाही. दिल्लीश्वरांना ‘हीच ती आपली वेळ’ असे वाटले. त्यामुळे सरकारविरोधात राज्यपालांना भेटण्यापासून अपयशाबद्दलच्या आंदोलनापर्यंत सर्व वातावरण तापवले गेले. या संशयाच्या आणि गेंधळाच्या वातावरणात रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्वीटरद्वारे तेल टाकले आणि ड्रायव्हिंग सीटवरील ठाकरेंना हटवण्यास हातभार लावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या रेल्वेलाही लाल बावटा लागला. चित्र असे तयार झाले की, ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर आहेत, पवारांना उद्योग सुरू करण्याचा ऍक्सीलेटर वाढवायचा आहे आणि काँग्रेसला न्याय योजनेचा गिअर टाकायचा आहे. परिणामी एकच सत्ताकल्लोळ माजला. पण, सगळा फुगा फुटला तो पवारांची ठाकरेंशी चर्चा, नाना पटोलेंची राहुल गांधीशी चर्चा आणि राहुल गांधींची ठाकरेंशी चर्चा या दरम्यान! सर्वांनी एकमेकाचा सन्मान राखायचा असे बैठकीत ठरले आणि मग तीन तासांनी अनिल परब, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या राज्य सरकारच्या तीन प्रमुख मंत्र्यांनी खापर बिचाऱया फडणविसांवर फोडले…. त्यांना महाराष्ट्राच्या हितविरोधी ठरवले… मग या फसलेल्या बाजीवर उत्तर द्यायला कोणीतरी बाजीगर हवाच! भाजपने मग उतरवले राधाकृष्ण विखे पाटील! ड्रायव्हिंग सीटचा असा हा महिमा…!
Previous Articleन्यूयॉर्क आणि मुंबई
Next Article कोविड-19 मध्ये डोळय़ांची काळजी घेणे महत्त्वाचे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.