प्रतिनिधी/ बेळगाव
‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा’ जणू असे सांगत शनिवारी बेळगावमधून पहिली श्रमिक रेल्वे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या दिशेने रवाना झाली. 1 हजार 600 हून अधिक मजुरांना घेऊन ही रेल्वे सायंकाळी रवाना झाली. गावाकडे परतण्याची ओढ लागलेले हे मजूर भारतमातेचा जयजयकार करीत आपला आनंद व्यक्त करीत होते.
परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी रेल्वे विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्या मजुरांनी नोंदणी केली आहे त्यांना रेल्वेने त्यांच्या गावी पोहचविले जात आहे. नैर्त्रुत्य रेल्वेनेही राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधून 2 लाखांच्या आसपास मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविले आहे.
शनिवारी दुपारी सीपीएड मैदानावर सर्व मजुरांना बोलाविण्यात आले होते. बेळगावबरोबरच आसपासच्या जिल्हय़ांमधील मजुरांचा यामध्ये समावेश होता. परिवहन मंडळाच्या बसेसद्वारे या मजुरांना रेल्वेस्टेशनपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली. परजिल्हय़ातील मजूर थेट बसने रेल्वेस्थानकात दाखल झाले. रेल्वेस्टेशनवर पोहचल्यावर मजुरांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. सॅनिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळत मजुरांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात आला.
मनपाने केली अल्पोपाहाराची व्यवस्था
मजुरांना स्थानकात आल्यानंतर अल्पोपाहाराचे वितरण करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेने अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. प्रत्येक मजूर व त्याच्या कुटुंबीयांना फळे, अल्पोपाहार वितरित करण्यात येत होते. रेल्वे व स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मजूर सोडून इतर कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये सोडण्यात येत नव्हते.
बेळगावमधून धावली पहिली श्रमिक एक्स्प्रेस
बेळगावमध्ये अडकलेल्या मजुरांची सीपीएड मैदानावर नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार मजुरांची माहिती रेल्वे विभागाला देण्यात आली होती. त्यानुसार 1 हजार 112 मजुरांना उत्तर प्रदेशला पाठविण्यासाठी बेळगावमधून श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बेळगावमधून धावणारी ही पहिलीच श्रमिक रेल्वे आहे.
अधिकाऱयांनी घेतली मेहनत
मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी रेल्वे, जिल्हा प्रशासन, कामगार विभाग, मनपाने कंबर कसली. रेल्वेस्थानकावर मनपा आयुक्त जगदीश के. एच., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कामगार उपायुक्त शिगेहळ्ळी यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.