गणेशोत्सवानंतर परत सुरू होणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्रकमालक संघटनांच्या शिष्टमंडळाला दिली माहिती
वार्ताहर / काकोडा
पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर 13 जूननंतर राज्यातील सर्व खनिज वाहतूक बंद होणार असून गणेशोत्सवानंतर ती सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील ट्रकमालक संघटनांना दिली.
राज्यातील ट्रकमालकांचे विविध प्रश्न घेऊन दक्षिण गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राऊत देसाई, खजिनदार कॅजिटन फर्नांडिस, उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष सुरेश देसाई, सचिव बालाजी गावस, खजिनदार यशवंत परब तसेच अखिल गोवा मशिनमालक संघटनेचे अध्यक्ष संदीप परब यांनी साखळी येथे मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर मार्गाने राज्यातील खनिज व्यवसाय अखंडितपणे सुरू रहावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांचे हित जपण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
चर्चा करून दर ठरविणार
पावसाळय़ानंतर खनिज वाहतूक सुरू होण्यापूर्वी ट्रकमालक संघटनांशी चर्चा करून दर ठरविण्यात येईल, असेही आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कॅजिटन फर्नांडिस यांनी सांगितले. खनिजवाहू ट्रकांना योग्य दर मिळायला हवा असे सरकारचे मत आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल्याचे फर्नांडिस म्हणाले.
विलंब शुल्काचा मुद्दा सोडविण्याचे आश्वासन
केंद्र सरकारने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रस्ता कर भरण्याच्या बाबतीत व्यावसायिक वाहनांना सूट दिलेली असताना केपे वाहतूक विभागातर्फे खनिजवाहू ट्रकांकडून विलंब शुल्क आकारण्यात येत असल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱयाला त्वरित बोलावून घेऊन विषय सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
खनिज वाहतुकीसाठीचा बगलरस्ता पूर्ण करणार
त्याचप्रमाणे खनिज वाहतुकीसाठी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात झालेले बगलरस्त्याचे अर्धवट स्थितीतील काम कोविड-19 चे संकट दूर झाल्यानंतर लगेच हाती घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. खनिज वाहतुकीसाठी विशेष रस्ता नसल्याने सर्वसाधारण रस्त्यावरून होणाऱया खनिज वाहतुकीमुळे नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते असा मुद्दा शिष्टमंडळाने यावेळी उपस्थित केला. खनिज वाहतुकीमुळे होणारे धूळ प्रदूषण व वाहतूक समस्या यामुळे लोकांमध्ये असलेला रोष केवळ बगलमार्गाच्या बांधकामानेच दूर होऊ शकतो हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनाही योग्य वाटल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
लोकायुक्तांच्या भूमिकेचा निषेध
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खाण लीज नूतनीकरण करण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे राज्यातील खाण अवलंबितांना काही काळ का असेना पण काम मिळाले. त्यामुळे लोकायुक्तांनी पार्सेकरांच्या त्या निर्णयाच्या विरोधात जी भूमिका घेतली आहे त्याचा राज्यातील सर्व ट्रकमालक संघटना तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. पार्सेकर यांनी घेतलेला सदर निर्णय राज्यातील खाण अवलंबितांचे हित पाहता योग्य असाच होता. पार्सेकर यांना ट्रकमालक संघटनांचा पूर्ण पाठिंबा आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.