सीएमआयई अहवाल : मागील महिन्याच्या तुलनेत कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालानुसार 31 मे रोजी संपुष्टात आलेल्या आठवडय़ात बेरोजगारी दर 23.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. एप्रिलच्या 23.52 टक्क्यांच्या तुलनेत हा दर किंचित कमी आहे. तर 24 मे रोजी संपुष्टात आलेल्या आठवडय़ात बेरोजगारी दर 24.3 टक्के नोंदविला गेला होता. टाळेबंदीच्या मागील 8 आठवडय़ांदरम्यान सरासरी 24.2 टक्के बेरोजगारी दर राहिला आहे.
24 मे रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात श्रम भागीदारी दर 38.7 टक्के होता. त्यापूर्वीच्या आठवडय़ात हे प्रमाण 38.8 टक्क्यांपेक्षा कमी होते. शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात सातत्याने बेरोजगारी दर वाढत आहे. जानेवारी महिन्यात शहरी बेरोजगारी दर 9.70 टक्के होता, जो मे महिन्यात 25.79 टक्क्यांवर पोहोचला. याचप्रकारे जानेवारीमध्ये ग्रामीण बेरोजगारी दर 6.06 टक्के होता, जो मे महिन्यात 16.42 टक्क्यांनी वाढून 22.48 टक्क्यांवर पोहोचला आहे.
एप्रिलमध्ये एलपीआर घटला
श्रम भागीदारी दर मार्चमध्ये 41.9 टक्क्यांवरून 35.6 टक्क्यांवर आला आहे. श्रम भागीदारी दर (एलपीआर) साप्ताहिक आधारावर वाढत आहे. 17 रोजी संपुष्टात आलेल्या आठवडय़ात हे प्रमाण 38.8 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. एप्रिलमध्ये श्रमबळ पुन्हा परतल्याचे दिसून येत आहे.
नोकरीवर परतले
अहवालानुसार टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यावर मे महिन्यात सुमारे 2 कोटी जण नोकरीवर परतले आहेत. भारताचा रोजगार दर मे महिन्यात 2 टक्क्यांनी वाढून 29 टक्क्यांवर पोहोचला आहे.