वार्ताहर / खोची
हातकणंगले तालुक्यातील खोचीसह परिसरात गेले दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे परिसरात पेरणीपूर्व मशागतीसह पेरणीच्या कामाची धांदल सुरु झाली आहे. भात, सोयाबीन, भुईमूग आदीसह अन्य पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. तर काही शेतकरी उसाच्या लागणी करण्यात व्यस्त झाले आहेत. या भागातील शेतकरी निव्वळ पावसावर अवलंबून न राहता, या भागातून बारमाही तुडूंब भरून वहात असलेल्या वारणा नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या भागातील शेतकरी पेरणी, लागणी या मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या प्रारंभीच करतात.
बाजारात येणाऱ्या नवीन वाणांचा शेतकरी बियाणांसाठी वापर करू लागल्यामुळे पारंपारिक वाणे नष्ट होऊ लागली आहेत. अनेक जुन्या वाणांच्या जाती नष्ट होत आहेत. सध्या भात, भुईमूग, सोयाबीन पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. सध्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी केवळ बाजारातील बियाणांचा वापर न करता जुन्या बियाणांचा हि वापर करावा. तसेच सेंद्रिय खताचा वापर करावा. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सध्या दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांमध्ये जागृती झालेली नसल्याने शेतकरी नवीन बियाणांचा वापर करत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात भात, सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. खरीप हंगामातील पेरणी व टोकणी कामाची धांदल सुरू आहे.कृषी विभागाकडे कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध होते. त्यामुळे काहीवेळा शेतकरी वर्ग बाजारातून नवीन बियाणे मिळाले नसल्यामुळे शेतकरी घरचे बियाणे वापरतो.हे बियाणे वापरताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. अनेकवेळा उगवण क्षमता कमी असलेले बियाणे वापरले गेल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.त्यासाठी या घरगुती बियाण्यांवर बीज प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्याची उगवण क्षमता पाहणे देखील गरजेचे आहे. गेले दोन दिवस पाऊस पडल्यामुळे, तसेच सध्या ढगाळ वातावरण असल्याने व हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी वर्गाची पेरणीसाठी धांदल उडाली आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गाला बियाणे टोकण्यासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. काही ठिकाणी पयरा करून बळीराजा टोकणी करत आहे.