लडाखच्या 3 भागांमधून माघार : आज होणार महत्त्वपूर्ण चर्चा : फिंगर 4 संबंधी तणाव कायम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव संपुष्टात आणण्याच्या भारतीय कूटनीतिचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून आता चांगले संकेत मिळू लागले आहेत. चीनचे सैनिक पूर्व लडाखच्या तीन विविध क्षेत्रांमधून स्वतःच्या भागांमध्ये परतल्याचे समजते. चालू आठवडय़ात होणाऱया सैन्यस्तरीय चर्चेपूर्वी दोन्ही देशांच्या या कृतीमुळे एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेला तणाव संपुष्टात येण्याची आशा वाढीस लागली आहे.
भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान चालू आठवडय़ात पेट्रोलिंग पॉइंट 14 (गलवान क्षेत्र), पेट्रोल पॉइंट 15 आणि हॉट स्प्रिंग्स क्षेत्रासह लडाखच्या अनेक ठिकाणी बैठक होणार आहे. चीनचे सैन्य गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-15 आणि हॉट स्प्रिंग्स भागातून 2-2.5 किलोमीटर अंतराने माघारी फिरले आहे. 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेली चर्चा आणि आगामी बैठकीचा हा परिणाम असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
चीनच्या सैन्याने आपले पाऊल मागे घेतल्याने भारतानेही काही भागांमधून काही सैनिक आणि वाहनांना परत बोलाविले आहे. तणावाच्या मुद्दय़ांवर दोन्ही देशांच्या वतीने बटालियन कमांडर पातळीवर चर्चा होत आहे. चीनशी चर्चा करण्यासाठी भारतीय सैन्याचे पथक चुसुल येथे पोहोचले असून त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱयांना मदत केली जात आहे.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव संपुष्टात आणण्याच्या दिशेने भारत आणि चीन दोघांनही काही पावले उचलली आहेत. काही ठिकाणांवरून चिनी सैनिक मागे हटले असून त्यांनी स्वतःचे तंबूही काढून टाकले आहेत. परंतु फिंगर-4 वरून दोन्ही देशांमध्ये सहमती झालेली नाही. पँगोंग त्सोनजीकच्या फिंगर-4 संबंधीचा तणाव दूर करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. तेथून मागे हटण्यास चिनी सैनिक तयार नाहीत.
चिनी कारवाया
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू फिंगर-4 च आहे. तेथे चिनी सैनिक मोठय़ा संख्येत तैनात आहेत. यापूर्वी भारतीय सैनिक फिंगर-8 पर्यंत गस्त घालत असत. परंतु चिनी सैनिकांनी फिंगर-4 नजीकच त्यांना रोखण्यास प्रारंभ केल्याचे समजते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा फिंगर-8 जवळून जात असल्याची भारताची भूमिका आहे. काही ठिकाणांवरून चिनी सैनिक मागे हटल्याने विश्वास वाढविणे आणि चर्चेसाठी सकारात्मक वातावरण निर्मितीच्या दृष्टीने पावले उचलली जाऊ शकतात.
महत्त्वाची बैठक
6 जून रोजीच्या बैठकीतील चर्चेच्या आधारावर बुधवारी पुन्हा ‘हायेस्ट कमांडर’ स्तरीय चर्चा होणार आहे. तसेच आगामी 8-10 दिवसांमध्ये विविध पॉइंटवर लोकल कमांडर ते शिष्टमंडळ स्तरापर्यंत बैठका होणार आहेत. फिंगर-4 संबंधीचा तोडगा लवकर निघण्याची शक्यता तूर्तास दिसून येत नाही. लोकल कमांडर किंवा हायेस्ट लेव्हल मीटिंगच्या माध्यमातून हा तणाव दूर होणार नसल्याने पुन्हा एकदा कोर कमांडर स्तरीय बैठक आयोजित केली जाऊ शकते. यंदा ही बैठक भारताकडून आयोजित होणार आहे. 6 जून रोजीची बैठक चीनकडून मॉलडोमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर नवी बैठक भारतातील चुशूलमध्ये पार पडण्याची शक्यता आहे.
स्थिती पूर्वपदावर येणार
लडाखच्या पँगोंग त्सो सरोवर, गलवान खोरे आणि डेमचोक या तीन ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले होते. चिनी सैन्य या भागातील स्थिती पूर्वपदावर आणेपर्यंत स्वतःचे सैनिक मागे घेणार नसल्याचे भारताने अलिकडेच पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. चिनी अरेरावीला चोख प्रत्युत्तर देत भारताने सीमेवर कठोर भूमिका घेतली होती. चीनच्या दबावतंत्राला बळी न पडता भारताने उचललेल्या पावलांचा आता परिणाम दिसून येत आहे.