पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन : मालवण येथे ऑनलाईन राष्ट्रीय परिषद : ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील कोविडचे परिणाम व उपाययोजना’वर मार्गदर्शनही
प्रतिनिधी / मालवण:
कोविड 19 च्या उद्रेकामुळे उलथापालथ सुरू असताना जगभरात यावर मात करण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे. या निमित्ताने शुक्रवारी येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात ‘पोस्ट कोविड 19 स्ट्रटेजीस-चॅलेंजेस अँड इनोव्हेशन्स’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांबरोबरच भारतीय अर्थव्यवस्था व उद्योगविश्वही बदलले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील, याचा उहापोह पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी आपल्या बीजभाषणात केला. हेल्थ केअर इंडस्ट्री, डिजिटल माध्यमे, ऑरगॅनिक फार्मिंग, फूड प्रोसेसिंग, लॉजिस्टिकस इंडस्ट्री या क्षेत्रात उद्योगाच्या नव्या संधी प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ. कांबळे यांनी केले.
शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक दृष्टिकोन
दुसऱया सत्रात शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र तज्ञ प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवरील कोविडचे परिणाम व उपाययोजना यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय परिषदेच्या तिसऱया सत्रात केंद्रीय विद्यापीठ, अजमेर, राजस्थान येथील डॉ. जगदिश जाधव यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील अपेक्षित बदल, ऑनलाईन शिक्षणातील आव्हाने, कमतरता आणि अभिनवता या विषयावर समस्त शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक दृष्टिकोन दृढ करणारे विचार मांडले.
आत्मनिर्भर भारतसाठी पुढाकार घेणे गरजेचे
आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार चौथ्या सत्रात कोविडनंतरच्या काळात आपल्या देशाकडे इतर जगाच्या तुलनेत असणाऱया जमेच्या बाबींचा उहापोह केला. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत मांडले. मॅनेजमेंट गुरू आणि शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाचे डीन डॉ. अण्णासाहेब गुरव यांनी समारोपाच्या सत्रात सेवा क्षेत्रातील उद्योग आणि व्यवसायांना कशाप्रकारे या आव्हानाला सामोरे जाता येईल, स्वत:त बदल कसे घडवावे लागतील, या विषयावर प्रबोधित केले. देशभरातील विविध विद्यापीठातील व महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, तज्ञ, उद्योजक, व्यावसायिक तसेच सेवा क्षेत्रातील लोकांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदविला.
शोधनिबंध यू-टय़ूबवर सादर
सुरुवातीला, परिषदेचे निमंत्रक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांनी उद्देश स्पष्ट करून स्वागत केले. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांनी उद्घाटनपर भाषणात चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या. कोविड नंतरची धोरणे-आव्हाने आणि अभिनवता या संकल्पनेशी निगडित विविध विषयांवरील शोधनिबंध या परिषदेच्या निमित्ताने यू-टय़ूबवर सादर करण्यात आले. लॉकडाऊन काळात ही राष्ट्रीय परिषद आयोजित केल्याने हा सर्व कार्यक्रम झूम ऍपच्या ऑनलाईन व्यासपीठावर झाला. परिषदेचे समन्वयक प्रा. बी. एच. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेच्या सचिव डॉ. सुमेधा नाईक आणि प्रा. शंकर खोबरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. एम. आर. खोत, प्रा. प्रसन्नकुमार मयेकर आणि नेत्रा खोत यांनी तांत्रिक सहाय्य केले.