ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना संकटात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता 24 तास कार्यरत असलेल्या पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आगामी काळात पोलीस दलात 10 हजार जागांसाठी पोलीस भरती करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत.
मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज बैठक पार पडली या बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, श्रीनिवास, अर्चना त्यागी आदी उपस्थित होते.