वार्ताहर/ माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे कुंभारखाणीकडे जाणाऱया मार्गावर तळीचे ठिकाण येथील भातशेतीमध्ये महावितरणच्या डीपीमधून ऑइल गळती होऊन सुमारे पंधरा गुंठे भात शेतीचे नुकसान झाले आहे.
आरवली येथील गरीब शेतकरी यशवंत नाचरे, मनोहर गुरव, संतोष गुरव, मुलु कुळ्ये, शिवदास गुरव यांची शेती कुंभारखाणी मार्गाला तळीचे ठिकाण येथे आहे, याच ठिकाणी असलेल्या महावितरणची विद्युत डीपीतून अनेक दिवसापासून ऑईलची गळती होऊन सुमारे पंधरा गुंठे परिसरात ते पसरल्याने भातपीक खराब झाले. सततच्या पावसाने हे ऑइल सर्वत्र पसरल्यामुळे नजीकज्या शेतीलाही धोका निर्माण झाला आहे. मात्र महावितरणचा एकही अधिकारी इकडे फिरकला नसल्याने शेतकरी वर्गापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. याबाबत तातडीने उपाययोजनांबरोबरच महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱयांकडून करण्यात आली आहे.