शिक्षण विभागाचा पुढाकार, लवकरच येणार पुस्तिका : ‘डाएट’ आणि क्रियाशील शिक्षकांची घेतली मदत
प्रतिनिधी / सावंतवाडी:
‘कोरोना’मुळे आता शाळा सुरू लवकर होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आता ठिकठिकाणी शिक्षकांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु नेटवर्कची समस्या, मोबईल वापराचे धोके असल्याने या प्रक्रियेला मर्यादा येत आहेत. यात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता शिक्षण विभाग चिंतेत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळय़ा प्रयोगाचा अभ्यास शिक्षण विभागातर्फे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. त्यासाठी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विषयवार स्वंयअध्ययन पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), ओरोस आणि क्रियाशील शिक्षक यांच्यावतीने ही पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. ही पुस्तिका छपाई करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.
‘कोरोना’मुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही झालेल्या नाहीत. त्यांना पुढील इयत्तेत प्रवेश देण्यात आला. परंतु ‘कोरोना’चा वाढता प्रकोप लक्षात घेता जूनपासुन सुरू होणारे शैक्षणिक सत्र अद्यापही सुरू झालेले नाही. जूलैपासून शाळा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन पालकांचे मत अजमावण्यात आले. काहींनी शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. अटी व नियमांना अधीन राहून शाळा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता. परंतु राज्य शासनाकडून शाळा सुरू करण्यास हिरवा कंदिल मिळालेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या
प्रशासनाच्या प्रयत्नांना खिळ बसली. आता तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत ऑगस्टनंतर शाळा सुरू कराव्यात, असा निर्णय झाला.
ऍप्समुळे फायदे आणि तोटेही
‘कोरोना’मुळे शाळा सुरू कधी होणार, याची ग्वाही कुणीही देऊ शकत नाही. तर शाळा सुरू होणार नसल्याने काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे प्रयोग सुरू केले आहेत. व्हिडिओ, विविध ऍप, व्हाट्स ऍप, झुम ऍपव्दारे हे शिक्षण देण्यात येत आहे. शहरात त्याला प्रतिसाद मिळत आहे. माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सदर प्रयोग विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मदतगार ठरत आहेत. परंतु नेटवर्कची समस्या, सातत्याने मोबाईल वापराचे परिणाम यामुळे या शिक्षणाला मर्यादा येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्कअभावी अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीतही माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी
प्रयत्नशील आहेत.
शिक्षकांचे प्रयत्न, तरीही चिंता
जिल्हा परिषदेच्या बहुसंख्य शाळा ग्रामीण भागात आहेत. त्यांना नेटवर्कची समस्या कायम असते. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्यात समस्या जाणवत आहेत. काही शिक्षक विद्यार्थ्यांना व्हॉट्स ऍपव्दारे प्रश्न पाठवून ती सोडवून घेत आहेत. परंतु सध्या देण्यात येणारे शिक्षण जर-तरचे आहे. यात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता शिक्षण विभाग चिंतेत आहे. त्यामुळे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययनाचा प्रयोग शिक्षण विभाग राबविणार आहे.
शिक्षण विभाग स्वयंअध्ययन पुस्तिका आरोस येथील शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था तसेच क्रियाशील शिक्षक यांच्याकडून बनवुन घेत त्या पुस्तिका उपलब्ध करून देणार आहे. या पुस्तिकांची छपाई लवकरच होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी शाळा सुरू होईपर्यंत शैक्षणिक प्रवाहात येऊन त्यांच्या विचारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. ‘कोरोना’मुळे शाळा कधी सुरू होतील, याची कुणीही ग्वाही देत नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा हा प्रयोग विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.