प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रत्नागिरी जिह्यात या महिन्यात ब्रेक द चेन अंतर्गत सुरुवातीला 1 ते 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यांनतर 15 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेंय. मात्र जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय योग्य नाही. सर्वाना विश्वासात घेऊन लॉकडाऊन जाहीर करण्यात यायला हवा होता, असे जिल्हा काँग्रेसचं म्हणणे आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाच्या मनमानी आणि आडमुठे कारभाराचा निषेध करण्यासाठी आज सत्याग्रह आंदोलन करण्यात आल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी सांगितले. यावेळी लॉकडाऊनच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रवत्ते अशोक जाधव, हारिस शेकासन, दीपक राऊत, कपिल नागवेकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.