प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व परिसरात घरोघरी असंख्य दिवे प्रज्वलित करून दिव्यांची अवस म्हणजे सोमवती अमावास्या श्रद्धेने साजरी करण्यात आली. कुटुंबातील सर्वांनीच कोरोनामुळे निर्माण झालेला अंधकार दूर होऊन आरोग्याचे दीप प्रज्वलित होवोत, अशी प्रार्थना केली.
घरातील सर्व दिवे महिलांनी स्वच्छ धुवून त्यांना झळाळी आणली. त्यानंतर सर्व दिवे प्रज्वलित केले. ही अमावास्या किंवा ज्याला आज गटारी म्हटले जाते ती खरे म्हणजे प्रामुख्याने शेतकऱयांसाठी आहे. गटारी हा कष्टहारी या शब्दाचा अपभ्रंश आहे. शेतात शेतकरी अखंड राबतात. ढगाळ वातावरणामुळे उजेड कमी होतो. मन उदास होते. शेतकऱयांचे कष्टाचे दिवस संपले म्हणून घरात दीपपूजन करून श्रावणाच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला जातो.
भारतीय संस्कृतीत दिव्याला महत्त्व आहेच. दीपपूजनाने ते अधोरेखीत केले जाते. सकाळी आणि संध्याकाळी सर्व दिवे प्रज्वलित करण्यात आले. सकाळच्या सत्रात गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळच्या कातरवेळेत प्रज्वलित केलेल्या दिव्यांनी परिसर उजळून निघाला. कोरोनामुळे संपूर्ण जगात पसरलेला अंधकार दूर व्हावा, अशी प्रार्थना सर्वांनी केली.