सलगरे /वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन सह ग्रामीण भागात जनता कर्फ्यूची अंमलबजावणी लागू केली आहे. आरग येथे जनता कर्फ्यूला धुडकावून गुरुवारचा आठवडी बाजार भरविण्यात आला. ना मास्क , ना सामाजिक आंतर, फक्त गर्दी करीत प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून आरग परिसरात शिंदेवाडी बेळंकी, एरंडोली, शिपूर , व्यंकोजीवाडी व मालगाव या गावात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गावात आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र , कोणत्याही प्रकारचे गांभीर्य न ठेविता बाजारात फिजिकल डिस्टन्स चे तीन तेरा वाजले आहे. खरेदीसाठी व्यापारी , शेतकरी , ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बहुतेकजण तोंडाला मास्क न लावताना फिरताना दिसत होते. नागरिक बेफिकीर वागत बाजारात फिरत आहेत. बाजारपेठेतील मोबाईल , हार्डवेअर, स्टेशनरी, हॉटेल , ऑटोमोबाईल , पान टपरी , किराणा व कापड अश्या सर्वच दुकानात सोशल डिस्टंसिंग न ठेवता गर्दी दिसून आली. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सूचनांकडे कानाडोळा करीत नियमावलीचा फज्जा केला आहे.
ग्रामीण भागात कोणतेही आदेश काढण्यात आले नाहीत. लोकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे.
रणजित देसाई, तहसीलदार, मिरज
सरपंचांनी उल्लंघनाच्या कारवाई संदर्भात ग्रामसेवक व तलाठी यांना विचारणा केली असता तो अधिकार ग्रामपंचायतीला नाही असे सांगण्यात आले. म्हणून शासकीय अधिकारी जर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही असे म्हणत असतील तर सरपंच कारवाई कशी करणार
विशाखा कांबळे, सरपंच
बाजार न भरण्याबाबत व्यापारांना आम्ही सूचना केली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार तलाठ्यांना नाही. तसेच जनता कर्फ्यू मध्ये जनतेनेचे ठरवावे काय करावे ते. तसेच तुम्हाला प्रतिक्रिया हवी असेल तर मला तहसीलदारांशी बोलून घ्यावे लागेल
पी.पी.कोळी, गाव कामगार तलाठी , आरग