रिफायनरीला ठाकरेंकडून यापुर्वीच पुर्णविराम
प्रतिनिधी / रत्नागिरी
नाणार रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी कधीच पुर्णविराम दिला आहे, त्यामुळे हा प्रकल्प होणार नाही ही काळय़ा दगडावरची रेष आहे. मात्र रोजगार निर्मितीसाठी रत्नागिरीत सुमारे 200 एकर जागेमध्ये मोठा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
नाणार प्रकल्पाबाबत दोन महिन्यामध्ये निर्णय घेण्याचा अल्टीमेटम केंद्र शासनाने राज्याला दिल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दोन दिवसांपुवी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यावर बोलताना सामंत म्हणाले, जनतेची भूमिका उचलून धरत शिवसेनेने दिलेला शब्द पाळत नाणार प्रकल्प रद्द केला. आता केंद्राने काय अल्टिमेटम दिला हे आपल्याला माहित नाही. परंतु प्रकल्प रद्दची घोषणा मागे घेतली जाणार नाही. नाणार प्रकल्प होणार नाही, हे काळ्या दगडावरची रेष आहे.
तरूणांचा हाताला रोजगार मिळावा यासाठी जिह्यात नवीन उद्योग यावेत या मताशी आपण सहमत आहे. कोरोनामुळे जिह्यात मोठय़ा प्रमाणात मुंबई व इतर जिह्यातील चाकरमानी नोकऱया सोडून आले आहेत. त्यांना रोजगाराची संधी मिळाली यासाठी सुमारे 200 एकरमध्ये मोठा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यामध्ये त्याचे काम सुरू होईल व तीन वर्षात तो पुर्ण होईल अशी माहिती सामंत यांनी दिली.
हा महाकाय प्रकल्प कोणता असेल याबाबत सामंत यांनी अधिक स्पष्टीकरण दिलेले नाही. कोकण कृषी विद्यापीठाशी चर्चा करून कृषीविषयक रोजगार देण्याबाबतही सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे यांनी यापुर्वी बिच शॅक्सची घोषणा केली आहे. त्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून आरे-वारे (रत्नागिरी) आणि गुहागर किनाऱयांचा समावेश केला आहे. त्यामुळे सामंत यांनी जाहीर केलेला प्रकल्पही पर्यटनाशी संबधीतच असावा अशी शक्यता आहे.