यावर्षी देखील मुलींची बाजी
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण विभागीय मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल सलग नवव्या वर्षी राज्यात अव्वल ठरला. मंडळाचा निकाल 98.77 टक्के लागला आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक निकाल ठरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.93 टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्याचा 98.69 टक्के लागला. या निकालात यावर्षीदेखील मुलीच सरस ठरल्या आहेत.
कोरोनामुळे यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल लागण्यास सुमारे सव्वा महिना उशिर झाला होता. पण अशा परिस्तिथीवर मात करून हा निकाल लावण्यासाठी परीक्षक, विभागीय मंडळाने मेहनत घेतली. कोकणात यंदा परीक्षा केंद्रावर एकही गैरमार्ग, कॉपीचा प्रकार आढळला नाही.
गतवर्षी कोकण मंडळाचा निकाल 88.38 टक्के व यंदाचा निकाल 98.77 टक्के लागला होता. त्यात यावर्ष्षी तब्बल 10.39 टक्के निकालात वाढ झाली आहे. दहावीचा निकाल बुधवार 29 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. सन 2012 पासून कोकण विभागीय मंडळ अस्तित्त्वात आले आणि त्या वर्षीपासूनच सलग नवव्या वर्षी या मंडळाचा निकाल अव्वल लागला आहे. यंदा कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला.
या परिक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून 22,547 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 22,506 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील 22211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11185 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी 11180 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 11060 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात एकूण 33686 पैकी 33271 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 98.39 टक्के व मुलींचे 99.16 टक्के म्हणजे मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 0.77 टक्के अधिक आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची टक्केवारी चांगली आहे. रत्नागिरीतून 1353 विद्यार्थ्यांपैकी 1059 विद्यार्थी (78.27 टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 460 विद्यार्थ्यांपैकी 355 उत्तीर्ण (77.17 टक्के) झाले.
रत्नागिरीतील 414 माध्यमिक शाळांसाठी 73 परीक्षा केंद्रे व सिंधुदुर्गातील 228 शाळांसाठी 41 परीक्षा केंद्रे होती. परीक्षेसाठी 103 मुख्य केंद्रे होती. संभाव्य कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 28 शाळांमध्ये चित्रीकरण करण्यात आले. 19 शाळांना भरारी पथकांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र कोकणात कॉपीचे प्रकार घडले नाहीत.
गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन करता येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंगद्वारे भरता येणार आहे. मार्च 2020च्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह बसून उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन श्रेणी, गुण सुधार योजना उपलब्ध राहणार आहेत.