प्रतिनिधी / बार्शी
कोरोना काळात गोरगरिबांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत पुढे आला आहे. लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना देण्यासाठी सरकारने दिलेला 2 हजार 220 पोती तांदूळ काळ्याबाजारात जाताना पोलिसांनी पकडला आहे. तब्बल 33 लाख रुपायांचा 110 टन तांदूळ पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बार्शी बाजार समितीतील वादग्रस्त व्यापारी भिमाशंकर खाडे यास पोलिसांनी अटक केली असून तिघांविरोधात नवी मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनामुळे सर्वत्र नाकेबंदी आणि संचारबंदी असतानाही रेशन दुकानातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तांदूळ गोळा करुन तो सर्व अडथळे पार करुन मुंबईपर्यंत पोहचल्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठी नाचक्की झाली आहे.लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांची उपासमार होवू नये यासाठी सरकारने अत्यल्प किंमतीत आणि मोफत अशा दोन प्रकारचा मोठा अन्नसाठा रेशन दुकानांना पुरविला आहे. मात्र प्रशासनाशी संगनमत करुन नेहमीप्रमाणे रेशन दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात धान्यसाठा काळाबाजारात पुरविला आहे. बार्शी येथून चार कंटेनरमध्ये भरुन हा तांदूळ पनवेल येथे नेण्यात आला. तेथील एका गोदामात हा साठा ठेवण्यात आला होता.